Blog: हरियाणात 5 ऑक्टोबरला निवडणुका ( Haryana Assembly Election 2024)  होणार आहेत. सर्वच पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. दिल्लीतील काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने हरियाणात निवडणुकीबाबत एक सर्व्हे केला असून त्यात काँग्रेसला स्पष्टपणे स्वबळावर सत्ता मिळणार असे दिसत आहे. मात्र असे असतानाही काँग्रेसला हरियाणात निवडणूक लढवण्यासाठी आपची मदत का लागणार आहे ते कळत नाही. लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेले असतानाही हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. सध्या तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणात सर्वच्या सर्व म्हणजे 90 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. दोन्ही पक्षांनी हरियाणात उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठकाही घेण्यास सुरुवात केली होती आणि अचानक आता काँग्रेसला हरियाणात आपची मदत घ्यावाशी वाटत आहे. हरियाणात युती करण्यासाठी आतापर्यंत काँग्रेस आणि आपमध्ये दोन बैठका झाल्या असून येत्या एक-दोन दिवसात युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले जात आहे. आपचे राघव चड्ढा आणि काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांच्यात या दोन बैठका झाल्याचे समजते. काँग्रेसने युतीबाबत दीपक बाबरिया आणि अजय माकन यांची समिती बनवली आहे. जागावाटपावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही, जोपर्यंत जागावाटप होत नाही तोपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच राहाणार आहे. 


जागा वाटपाच्या पहिल्या दोन राऊंडमध्ये आपने दहा जागा मागितल्याची माहिती आहे. हरियाणात आप लोकसभेची एक जागा लढली होती, एका लोकसभा क्षेत्रात 9 विधानसभेच्या जागा येतात, त्या अनुषंगाने आपने 10 जागांची मागणी केली आहे. मात्र काँग्रेस फक्त 7 जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र काँग्रेस हरियाणात आपसोबत युती करण्यासाठी एवढा आटापीटा का करीत आहे? याचे कारण फक्त भाजप आहे.


काँग्रेसचा सर्व्हे काँग्रेसच्या बाजूने असला तरी निवडणुकीत काहीही होऊ शकते. आप वेगळी लढल्यास मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. आणि काँग्रेसला हेच टाळायचे आहे. लोकसभेला याची चुणूक दिसलीच होती. लोकसभेला आप आणि काँग्रेसने युती केली होती, त्यामुळे त्याचा फटका भाजपला बसला आणि त्यांच्या मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर घसरली होती. त्याच फॉर्म्यूल्यावर पुन्हा एकदा चालत भाजपला तिसऱ्यांदा सत्तेवर येऊ न देण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे आणि त्यासाठीच त्यांना आपची मदत हवी आहे. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे दिल्लीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले होते पण तेथे भाजपने या दोघांवर मात करीत त्यांना धूळ चारली होती.


राहुल गांधींना आपसोबत का हवी?


हरियाणातही भाजप मुख्य पक्ष असला तरी  येथे तो जेजेपी आणि चंद्रशेखर यांची आघाडी, आयएनएलडी आणि बसपासोबत मिळून निवडणूक लढवत आहे. अशात जर आप स्वतंत्रपणे निवडणूक लढली तर त्याचा फटका काँग्रेसलाच बसणार आहे. आणि हा फटका बसू नये म्हणूनच राहुल गांधींना आप सोबत हवी आहे. आणि समजा आप आणि काँग्रेसची युती झालीच तर ती राष्ट्रीय राजकारणात नवीन गोष्ट असेल असे नाही. कारण यापूर्वी आप आणि काँग्रेसने मैत्री करत निवडणुका लढलेल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आप इंडी अलायंसचा भाग होतीच. काँग्रेस आपच्या मैत्रीवर बोलायचे झाले तर 2013 मध्येच त्यांची सर्वप्रथम मैत्री झाली होती. 2013 च्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आप सर्वप्रथम निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. भाजप आणि काँग्रेसवर मात करीत अरविंद केजरीवाल यांच्या आपने चांगले यश मिळवले होते पण सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नव्हते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने आपला बाहेरून पाठिंबा दिला आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदी बसले. मात्र हे सरकार औटघटकेचे ठरले. लोकपाल बिलालाा विरोध केल्यानं अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि हे सरकार 49 दिवसातच कोसळले. त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि आप स्वबळावर सत्तेवर आले.


सीमाभागात आपच्या प्रभावामुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता


2023 मध्ये भाजपवर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या इंडी अलायंसमध्ये अरविंद केजरीवाल सामील झाले. गेल्या वर्षी म्हणजे  2024 मध्ये  चंदीगड महापौर निवडणुकीत आप आणि काँग्रेस एकत्र आले होते. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्ली, गुजरात आणि हरियाणात आप आणि काँग्रेस एकत्र लढले होते. मात्र पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसने वेगळी चूल मांडली होती. गुजरातमध्येही आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढले त्यात काँग्रेसचेच नुकसान झाले होते. दुसरी गोष्ट म्हणजे हरियाणाला लागूनच असलेल्या पंजाबमध्ये आपचे सरकार आहे. त्यामुळे सीमाभागात आपच्या प्रभावामुळे काँग्रेसला फटका बसू शकतो हे काँग्रेस नेते राहुल गांधींना चांगले ठाऊक आहे. 


तुरुंगात असलेले अरविंद केजरीवाल युतीबाबत अंतिम निर्णय घेणार


मात्र निवडणुकीत फायदा व्हावा आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे या एकाच हेतूने काँग्रेस आणि आप कधी एकत्र आले तर कधी वेगवेगळे लढले, मात्र यावेळी काँग्रेसला हरियाणात कोणत्याही स्थितीत सत्ता प्राप्त करायची असल्यास त्यांना आपची मदत हवी आहे आणि त्यासाठीच राहुल गांधी प्रयत्न करीत आहेत. सध्या तुरुंगात असलेले अरविंद केजरीवालच या युतीबाबत अंतिम निर्णय घेणार असून काँग्रेसला मदत करण्याच्या बदल्यात ते जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतील हे निश्चित.