हजारो थरार, चकमकी, रक्तपात, लढा या शब्दांनी वेढलेल्या आणि बांधलेल्या ठिकाणी जाता येणं हा खूप मोठा अनुभव असतो. आपल्याच राज्यात काही किलोमीटर अंतरावर जंगलानं वेढलेल्या दुनियेत आमचा प्रवेश झाला.. 'नमो vs रागा' या कार्यक्रमासाठी गडचिरोलीकडे सकाळी लवकर आम्ही निघालो. गडचिरोलीत तो दिवस तसा तणावाचाच होता.


मंत्रालयापासून 1200 किलोमीटर पसरलेला विस्तीर्ण जिल्हा. चंद्रपूरनंतर चौपदरी रस्ता संपतो, आणि एकसलग, लांबलचक, काळा कुळकुळीत पोटातलं पाणीही हलणार नाही, असा रस्ता सुरु होतो. गडचिरोलीच नाही तर विदर्भातही पहिल्यांदाच येणाऱ्या नवख्या माणसासाठी हा काळाकुट्ट रस्ता, त्यावरील प्रत्येक झाड काहीतरी बोलू पाहातं. रक्तरंजित कहाण्या सांगतं. हा रस्ता घनदाट जंगलाच्या गाभ्यात घेऊन जातो हे माहिती असतं. मध्ये मध्ये लागणारी गावं, छोट्या वस्त्या विद्युत वेगाने मागे टाकत पुढे जाताना अचानक आमच्या गाडीचा टायर फुटला. 120 च्या स्पीडने गाडी जाईल असा रस्ता होता. पण गावाजवळ असल्यामुळे आमचा स्पीड कमी होता. त्यामुळे टायर फुटीचा अघोरी परिणाम झाला नाही.

स्टेपनी लावणं सुरु होतं तोपर्यंत आम्ही जवळच्या गावात गेलो. अतिशय टुमदार गाव..स्वच्छ, सुंदर,नेटकी माणसं. 2-3 तासच वीज जाते आणि त्यातच समाधान मानणारी माणसं. त्यांच्याशी बोलेपर्यंत गाडीचा टायर बदलून झाला. आणि मग आम्ही आलापल्लीच्या दिशेनं निघालो. लोकसभा निवडणुकीचा कौल घेताना, आलापल्लीमधलं कॉलेज आम्ही फायनल केलं होतं. दोन्ही बाजूच्या झाडीने पुन्हा आम्हाला आतमध्ये ओढलं. आता दुतर्फा असलेलं जंगल आणखी घनदाट होत होतं. आणि एका क्षणात वैनगंगेचं विस्तीर्ण पात्रं दिसलं. एका फोटोवरुन दुसऱ्या फोटोवर जावं तसं ते चित्रं.

मोदी की राहुल गांधी? , भाजप, काँग्रेस की आणखी काही, विकास झाला की नाही. झाला तर तो पोहचला का, या प्रश्नांची उत्तरं काय येतील यासाठी आम्ही अतिशय उत्सुक होतो. आलापल्लीकडे जाताना एका पॉईंटला रेंजही गेली. आणि आणखी हायसं वाटलं. परिघातल्या माणसांपासून लांब गेल्याचा व्हर्च्युअल फील आला. रस्त्त्यावरुन जाताना मध्ये लागलेलं खोपटं असो, वा गाडी कोणत्याही नाक्यावरुन जातानाचा अनुभव असो. प्रत्येक माणूस आमच्याकडे फक्त बघत नव्हता, तर आम्हाला पूर्णपणे न्याहाळात होता, निरखत होता. गाडीचा नंबर पाहात होता. आमच्या पुढच्या- मागच्या 2-3 गाड्यांना तर नंबरही नव्हते. आमचा प्रतिनिधी रोमित आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होताच. त्याने नाक्यावर आम्हाला घ्यायला पाठवलेल्या गाडीला पण नंबर नव्हता. त्याचं कारण आम्हाला पुढे कळलंच..



तर त्या निरखणाऱ्या नजरा बघत, नक्षल्यांच्या क्रौर्यरुपाची आठवण काढत आम्ही आलापल्लीच्या महाविद्यालयात पोहचलो आणि आमचा मूडच बदलला. आपल्यापर्यंत क्वचितच पोहचणारा मीडिया येणार म्हणून कॉलेजमधले विद्यार्थी त्याआधी पासून एक तास भर उन्हात बसले होते. आम्ही कॉलेजमध्ये जाताच आमचं कधीही झालं नाही असं स्वागत झालं.

आता गडचिरोलीच्या राजकीय परिस्थितीबाबत सांगते. अधिकारी वर्गाचा इथे खूपच जाच आहे असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. अहेरीचे पालकमंत्री आमदार राजे आत्राम, खासदार अशोक नेते भाजपाचे. पण आम्ही जेव्हा 'नमो' गटाकडून कोण बोलेल? असं विचारलं तेव्हा केवळ 3 ते 4 विद्यार्थ्यांनी हात वर केला. अखेरीस आमचा कार्यक्रमसुद्धा सत्ताधाऱ्यांच्या  बाजूने बोलणारे 3-5 विद्यार्थी विरूद्ध अनेक असाच झाला.

आम्ही पोहचलो त्या दिवशी गडचिरोलीमध्ये तणाव होता. तीन दिवसांपूर्वीच नक्षल्यांनी आलापल्लीपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मजुरांची हत्या केली होती. आम्ही गेलो त्याच दिवशी वरवर राव यांना कोर्टात हजर केलं जाणार होतं. म्हणून अनेक ठिकाणी जाळपोळ झाली होती. आणि अशा तणावापूर्ण वातावरणामध्ये उभं राहून नक्षलवाद कमी झालाय का?, नक्षल्याचा किती त्रास होतो?, असा प्रश्न आम्ही मुलांना विचारला. त्यावर मुलंही भडाभडा बोलली.



नोटाबंदीनंतर नक्षलवाद कमी झाला नाहीये, हे स्थानिक वास्तव आहे. कितीही आकडेवारी तोंडावर फेकली तरी स्थानिकांची रोजची परवड आहे. किंबहुना नक्षलवाद कमी होण्यापेक्षा या संघर्षाला आणखीनच भडक किनार मिळतीये. शोषितांचे प्रश्न मांडण्याचे, सोडवण्याचे दावे करणाऱ्या नक्षलवादाकडे आता स्थानिक आकर्षित होत नाहीये. हिंसा नकोय, विकास हवाय ही बोचरी अपेक्षा घेऊन स्थानिक जगतोय. हिंसेने आणि 56 इंची छातीच्या फोल आश्वासनांनी, दोन्हींनीही इथल्या स्थानिकांचा घात केलाय.

आमचं गडचिरोली तुम्हाला वाटतं तितकं भयाण नाही, असं निरागसपणे सांगणारी मुलगीही इथेच भेटली. रोजगार, पाणी, वीज हे प्रश्न नेमकं कसे असतात याची जाणीव इथे गेल्यावर होते. रस्ते बांधणं, सुशोभीकरण करणं म्हणजे विकास का?, डांबरी रोड कोणासाठी? असे प्रश्न विद्यार्थी साहाजिक विचारू लागले आहेत.

पुणे मुंबईमध्ये टीव्ही-सिरीयलमध्ये किंवा अगदी मीडियामध्येही हरवत चाललेला डोळ्यातला स्पार्क, चुणचुणीतपणा इथल्या विद्यार्थिनींमध्ये ओतप्रोत भरलाय. अतिशय रेखीव डोळे, केसांचं नेटकं वळण पाहिलं की या मुलींचा हेवा वाटतो. सूर्यास्तानंतर अतीव शांततेत शिरणाऱ्या गावांमधूनच सकाळी या मुली इतक्या आत्मविश्वासानं बाहेर पडतात, की वाटतं, यापेक्षा धाडसं दुसरं काय असतं.?

हा सगळा विचार करत, नक्षल्यांमुळे त्रस्त झालेल्या, राजकीय जुमलेबाजीनं वैतागलेल्या, आणि अधिकाऱ्यांच्या जाचानं रोज मरणाऱ्या नागरिकांचे आम्ही शतशः आभार मानले. एबीपी माझा आमच्यापर्यंत पोहचला, याचा आनंद जेव्हा हे बोलून दाखवतात, तेव्हा आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची तीव्र जाणीव होते.



'मीडिया मरत चाललाय' असं एकीकडे कानावर येत असताना, यांच्या डोळ्यातल्या अपेक्षा 'इथेच पाय रोवून उभी रहा' असं सांगतात.
मीडिया मुळे काहीही बदल होत नाही हो, असं कानावर येत असताना, आम्हाला बदल हवाय हे सांगू पाहणारी मुलं आणखीन जबाबदारी देतात.

तर हे विचार डोक्यात सुरु असताना वन विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये आमचं जेवण झालं. अस्सल सागाच्या लाकडापासून तयार झालेली खूप पुरातन वास्तू.. तिथून आता पुढे जायचं की माघारी निघायचं, असा विचार सुरु असताना रोमितनं आम्हाला आशा ठिकाणी नेलं, जिथे जाताना पावलोपावली चकमक, स्फोट, गोळीबाराचा इतिहास आणि वर्तमान आहे.

आम्ही कमलापूरच्या रस्त्यावर लागलो.. पश्चिम बंगाल मधल्या नक्षलबाडीत 1969 ला नक्षलवादी चळवळ आल्यानंतर याच कमलापूर मध्ये पहिल्यांदा नक्षली आणि स्थानिक अशी जाहीर सभा झाली. रयतू कुंडी ऑपरेशन असंही त्याला म्हटल जातं. नक्षलवाद समजावून सांगण्याच्या हेतूने स्थानिक - नक्षली या मैदानावर 1984 मध्ये समोरासमोर जमले. आणि त्यानंतर याला 'नक्षल्यांचं माहेरघर' म्हणतात. ती एक ऐतिहासिक सभा होती. तिथे पर्यंत पोहचणाऱ्या वळणांवर आजही अनेक चकमकी होतात.

मुख्य रस्त्यापासून कमलापूरकडे जायला डावीकडे वळलो आणि आमच्या मागे वन अधिकारी पोलिसांची आणखी एक गाडी जॉईन झाली.
कमलापूरच्या या मैदानावर आता हत्ती कॅम्प असतो. तो पाहायला पुन्हा वळणं, पुन्हा जंगल, असा रस्ता सुरु झाला. आता आमच्या मोबाईलची पूर्ण रेंज गेली. तसं स्थानिकांसाठी हे थ्रील वगैरे मुळीच नाही. किंबहुना यापेक्षाही गूढ वाढवणारे अनेक भाग गडचिरोलीमध्ये आहेत.. पण माझ्यासाठी प्रत्येक वळण नवीन होतं. थरारक होतं आणि पुढे जंगलात जाताना आता मागे फिरता येणार नाही याचं उगाचंच होणारं realization.. एका मंदिराच्या वळणार आमच्या पुढच्या गाडीने स्पीड कमी केला, आणि exactly याच point वर चकमकी होतात हं, असं सांगितलं.. काहीही कारण नसतांना मला भीतीनं अंगावर काटा आला.. मी त्या क्षणी शेवटचं कोणाशी, काय बोलले हे सपासप डोक्यात आलं. आमच्या बरोबर असलेले Anti Naxal ऑपरेशन चे रिटायर्ड ऑफिसर म्हणाले,  मी या भागात 3 वेळा गाडीतून उडून वायर मध्ये लटकलो आहे. 20 वर्षांच्या duty नंतर आता रिटायरमेंट घेतली. त्यात माझी गाडी टार्गेटवर आहे, म्हणून नंबर प्लेट काढायची. आणि त्या क्षणी मला गडचिरोली मध्ये शिरल्या पासून नंबर plates नसलेल्या गाड्या झरझर झरझर डोळ्यासमोर आल्या. आणि आता हा रस्ता केव्हा संपतोय असं झालं.



तेवढ्यात डावीकडचा वळण घेत आम्ही elephant camp ला पोहोचलो. चहूबाजूंनी वेढलेल्या जंगलात, नदीकिनारी डौलदार हत्ती उभे होते. त्यांची भांडणं, चित्कार संपूर्ण जंगलात घुमत होते. टिपिकल शहरी आकर्षणाचे मुद्दे पाहिल्यानंतर आम्ही मग मागे फिरलो. 4 वाजून गेले होते.. अंधार पडायच्या आत तिथून बाहेर पडायचं होतं.. खालच्या कमलापूर गावात आल्यावर वाटलं, 1984 साली साधारण 13-14 वर्षांचा मुलगा आता पन्नाशीचा असेल.. नक्षल्यांच्या 'त्या' सभेला आता तो किती relate करत असेल? आत्ता मैदानात खेळणारी मुलं, एखाद्या गल्लीतील हिंदू संघटनेचा बोर्ड, रुग्णालयाचं छोटं खोपटं, सूर्यास्ताची परतीची जनावरं, हे सगळं काय सांगतंय? इथे काहीही नसताना बाबा आमटे यांना माणूसपण रुजवणं किती अवघड गेलं असेल? हे सरळसोट रस्ते कुणासाठी आहेत? गडचिरोली म्हटल्यावर आजही आमटे यांचं कार्य, बंग यांची धडपड एवढंच आधी डोळ्यासमोर येणं, हे राज्यकर्त्यांचं, नेत्याचं आणि अगदी नक्षलींचंही अपयश नाही का?

आणि याच विचारात आलापल्ली च्या वेशीवर 'त्याला' भेटले. आत्मसमर्पण केलेला नक्षली. 13 व्या वर्षी नक्षलवाद्यांकडे आकर्षित झालेला तो एके काळचा नक्षली. पण एका ठराविक टप्प्यावर चुकलेल्या रस्त्याची जाणीव झाल्यावर त्यानं आणि त्याच्या बायकोनं आत्मसमर्पण केलं. आता 37 व्या वर्षी दोघं चूल मांडायचा प्रयत्न करत आहेत. दोघांनी जवळपास 70 चकमकी केल्या, हत्या केल्या. पण आता त्याच्याकडे वळूनही बघायचा नाहिये हे सांगणार्‍या त्याला मी कसं समजून घेऊ?

चळवळीसाठी नसबंदी केली, आता मूल होणार नाही त्याला. म्हणून त्यानं एका मुलीला दत्तक घेतलंय. आयुष्याकडे मागितलेली ही दुसरी संधी, भूतकाळाच्या किती वेदना, बोच घेऊन मिळाली असेल. त्याला पाहत रहावं असं खरंतर त्यात काहीच नाही. तो हिरो तर अजिबात नाही. किंबहुना त्याच्या हल्ल्यात कित्येक जवान, पोलिस शहीद झालेत.

दिवसभर इतकी वैचारिक, मानसिक घुसळण झाल्यानंतर भेटलेला 'तो', कायमस्वरुपी ज्यांच्या मी प्रेमात असेन ते विद्यार्थी आणि केवळ शिक्षा म्हणून नाही तर जीव लावून काम करणारे तिथले पोलिस यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. डिजिटल इंडिया, राम मंदिर, गोमांस बंदी या तिथल्या समस्या नाहीत. जगण्याचा संघर्ष असतो तेव्हा अस्मितांचं राजकारण चालत नाही हे या जिल्ह्यानी शिकवलं. मला आतून बाहेरून बदलवलं.