बैगा या आदिवासी जमातीची सृष्टीनिर्मितीची कथा ऐकली, तर तिचीही सुरुवात ‘विश्वात सगळीकडे पाणीच पाणी होतं’ अशीच आहे. या पाण्यावर एका तरंगत्या प्राचीन कमळपानावर ईश्वर विचारमग्न होऊन बसलेला होता. मग त्यानं आपली छाती चोळून मळ काढला आणि त्यापासून एक कावळी बनवली. तिला सांगितलं, “या पाण्यात कुठेतरी माती दडलेली आहे किंवा कुणीतरी तिला दडवून ठेवलेली आहे. माती शोधून काढायचं काम तुझं. त्यासाठीच तुझा जन्म झालाये.” कावळी अनेक वर्षं उडत राहिली, पण तिला काही मातीचा अत्तापत्ता लागला नाही. पण तिला एक अवाढव्य कासव मात्र दिसलं. त्याचे दोन पाय समुद्रतळाशी होते आणि दोन पाय आकाशाला टेकलेले होते. त्या कासवाचं नाव होतं कुँवर ककरामल! कावळी थकून त्याच्या पाठीवर विसावली आणि म्हणाली, “मी ईश्वराची कन्या आहे. माझ्याशी खोटं बोलायचं नाही. मला प्रामाणिकपणाने सांग की, माती कुठं आहे?” कासव तिला पाताळात घेऊन निघाला. पाताळात किचकमल नावाचा एक कीटकराजा होता. माती त्याच्या पोटात होती. पण कीटकराजाला कैद करता आलं, तरच माती मिळाली असती. त्यामुळे कासवानं कावळीला आधी धातूंचे देव असलेल्या पंचवीस भावंडांकडे नेलं. ती लोहदेवतेची मुलं होती. त्यातले बारा भाऊ लोखंडकाम करत आणि तेरा भाऊ तांबेकाम करत. या सगळ्यांनी मिळून कावळीच्या विनंतीनुसार एक मोठा पिंजरा बनवला. लोहदेवतेने त्यांना एक मोठी तार दिली आणि पिंजरा समुद्रतळाशी घेऊन जाण्यास मदत केली. या पिंजऱ्याला लहान-लहान खिडक्यादेखील होत्या. किचकमलराजा बारा वर्षांची झोप झोपला होता. त्याला कावळीने टोचा मारून जागं करायला सुरुवात केली. तो संतापून जागा झाला, तेव्हा त्याला बारा वर्षांची भूक लागलेली होती. तो चिडून म्हणाला, “कुणी मला जागं केलं? आता त्यालाच मी खातो.” कावळी त्याला ओरडून चिडवत पटकन पिंजऱ्यात शिरली. तिच्यामागोमाग झोपाळू डोळ्यांचा किचकमलदेखील सरपटत पिंजऱ्यात शिरला. कावळी पटकन खिडकीतून बाहेर पडली आणि तिनं पिंजरा बंद करून टाकला. ककरामलनं एक पाय पिंजऱ्यावर ठेवून दाब द्यायला सुरुवात केली. किचकमल चिरडून मरण्याच्या भीतीने प्रचंड घाबरून विनवण्या करायला लागला. ककरामल म्हणाला, “बऱ्या बोलानं माती या कावळीच्या हवाली कर, नाहीतर मरायला तयार हो!”
(दुर्गेश मडावी या आदिवासी चित्रकाराने काढलेले कासवाचे चित्र) किचकमल माती द्यायला तयार झाला. त्याच्या तोंडून मातीचे प्रचंड मोठे एकवीस गोळे बाहेर पडले. पहिला गोळा माता पृथ्वीचा, दुसरा पिवळ्या मातीचा, तिसरा काळ्या मातीचा, चौथा वाघासारखे हिंस्र प्राणी माणसांना खातात अशा पापी मातीचा, पाचवा गोळा नापीक मातीचा. सहावा गोळा गलिच्छ घाणेरड्या मातीचा आणि सातवा गोळा अस्पृश्य मातीचा. आठवा गोळा दुधाळ शुभ्र मातीचा, नववा देखणा व सुंदर. दहावा गोळा भूकंपप्रवण, अकरावा मिश्र मातीचा, बारावा लाल मातीचा, तेरावा उघडावाघडा, चौदावा पांढुरक्या मातीचा, पंधरावा दगडधोंड्यांनी भरलेला, सोळावा रेतीचा, तर सतरावा गोळा वाळूचा होता. अठरावा पूर्णत: बधीर मातीचा गोळा होता; एकोणिसावा अत्यंत सुपीक धान्य निपजवणाऱ्या मातीचा आणि विसावा दुष्काळी भेगाळ मातीचा. शेवटचा एकविसावा मातीचा गोळा पवित्र कुमारिका पृथ्वीचा होता.
(बालेन्द्र कुणाल उद्दे या आदिवासी चित्रकाराने काढलेले चित्र) कासवाने हे सगळे गोळे लोहदेवतेने दिलेल्या तारेत गुंफले आणि तो हार कावळीच्या गळ्यात घातला. मग कावळीला पाताळातून वर आणून सोडलं. इतकं वजन गळ्यात घेऊन कावळी बिचारी कशीबशी ईश्वराकडे गेली. मग ईश्वराने तो हार काढून घेतला आणि मातीचे ते सगळे गोळे कमळपानांच्या मोठ्या द्रोणात ठेवले. पाणसापापासून रवी आणि दोरी बनवून नऊ दिवस माती घुसळली. मग ती चांगली मऊ होऊन मिसळलेली माती थापून चपटा गोल आकार बनवून पाण्यावर ठेवला. सगळं पाणी त्या पृथ्वीने झाकून टाकलं. पण त्या तरंगत्या पृथ्वीवर काहीही ठेवलं की घसरून पडू लागलं; कारण तिला कशाचा आधारच नसल्यानं ती पाण्यावर सारखी डुचमळत होती आणि खूपच ओली व मऊशार होती. मग ईश्वरानं पवनदसेरीला म्हणजे वायूदेवाला बोलावून पृथ्वीला वाळवण्याचं काम दिलं. तो ईश्वराचा श्वासउच्छ्वासच होता. पण तो आंधळा असल्याने त्यानं केलेलं काम नीट झालं नाही. पृथ्वी कुठं वाकडीतिकडी कलंडली, तर कुठे टोकदार बनली. तरी तिच्यावर झाडं उगवली आणि पक्षीही येऊन बसले. पण त्यामुळे ईश्वराचं समाधान काही झालं नव्हतं. आपलं काम अधिक अचूक आणि सुंदर होण्यासाठी काय करावं याचा तो पुन्हा विचार करू लागला. त्यानं बैगाला जन्माला घातलं. लोहदेवतेने त्याला चार मजबूत खांब बनवून दिले. बैगाने ते पृथ्वीवर ठोकले. आणि पृथ्वी स्थिर झाली. तेव्हापासून बैगा जमातीचे आदिवासी पृथ्वीचे रक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. बैगा या शब्दाचा अर्थच मुळात जादूगार, शमन करणारा, बिघडलेलं दुरुस्त करणारा असा आहे.
(फोटो: कविता महाजन) याच कथेचा पुढचा कथाभाग अजून थोडा वेगळा आहे. तो पुढच्या लेखात पाहू.

घुमक्कडी मधील आधीचे ब्लॉग :

 

घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार

घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल

घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं

घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु

घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !

घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई