“छे छे... मला हे अजिबात पटलेलं नाहीये. निदान काहीतरी खेळायला तरी हवं.” वादळ म्हणालं. त्याचं हे म्हणणं विजेला लगेच पटलं. ती म्हणाली, “हो बाई, एका जागी न कडाडता जास्त वेळ बसून राहिलं तर मला आजारी पडल्यासारखंच वाटतं.”
आज पावसात वारे घुसले होते. त्यामुळे पाऊस एखाद्या बेवड्यासारखा झुलत होता. सरी कधी इकडे कधी तिकडे. निव्वळ अनागोंदी. त्यावरून फिलिपाईन्समधली एक लोककथा आठवली. एके दिवशी सर्वत्र सुरेख सोनेरी उन्हं पडली होती. आभाळातून एक निरुपद्रवी ढग निवांत भटकत जात होता. तो मजेत फिरतोय हे पाहून वारा आणि पाऊस त्याच्या पाठीवर जाऊन बसले. ते काही कष्ट न करता मजेत गप्पा मारत जाताहेत याचा विजेला आणि वादळाला राग आला. ती दोघंही घाईघाईनं ढगाच्या पाठीवर येऊन बसली. ढगाची या सगळ्यांशीच दोस्ती होती. त्यामुळे त्याला यात काही वावगं वाटलं नाही. तो तसाच इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत राहिला. वादळानं हळूच काड्या करायला सुरुवात केली. ते म्हणालं, “मला तर बुवा कंटाळा आलाय. हे काय नुसतं फुसक्या गप्पा छाटत बसायचं?” वारा म्हणाला, “कामाच्या वेळी काम करतोच की आपण, आता थोडा वेळ आहे म्हणून बसलोत निवांत, तर काय झालं?” “छे छे... मला हे अजिबात पटलेलं नाहीये. निदान काहीतरी खेळायला तरी हवं.” वादळ म्हणालं. त्याचं हे म्हणणं विजेला लगेच पटलं. ती म्हणाली, “हो बाई, एका जागी न कडाडता जास्त वेळ बसून राहिलं तर मला आजारी पडल्यासारखंच वाटतं.” वादळाचा खेळ होतो, पण लोकांचा जीव जातो, हे वाऱ्याला माहीत होतं. त्यामुळे तो म्हणाला, “मला या मऊ मऊ ढगावर नुसतं पडून राहायलाच मजा येतेय. मी नाही खेळणार.” पाऊस इतका वेळ गप्प होता, तो वैतागून म्हणाला, “जरावेळ तरी शांत रहा रे. काय सारखी वटवट करताय?” विजेनं वादळाला कोपरानं ढोसलं आणि वादळ ढगावर उभं राहून नाचू लागलं. वीज त्याला साथ देऊ लागली. ढगाला अजूनही वाटत होतं की, हे सगळं गमतीत चाललंय. पण मग वादळानं दुसरी काडी केली. ते म्हणालं, “काय वीजबाई, तुला काय वाटतं... वारा अधिक शक्तिमान की पाऊस?” वीज म्हणाली, “मला तर बाई, पाऊस आवडतो. त्याच्यासोबत नाचायला खूप मजा येते.” “काय पण आवड आणि कसली ती निवड?!” वादळ कुत्सित हसून म्हणालं, “वारा जास्त शक्तिमान आहे हे कबूल कर.” ( वादळ आणि वीज ) दोघांचं युद्ध सुरू झालं. अखेर वादळ म्हणालं, “हे बघ, खाली त्या वेळूबनात एक माकड बसलेलं दिसतंय. त्या माकडाला वेळूवरून जो खाली पाडेल, तो शक्तिमान. आहे का मंजूर?” काहीही कारण नसताना वारा आणि पावसाला त्यांनी भरीला पाडलं. म्हणाला, “पाऊस जिंकला तर वाऱ्यानं पावसाळ्यात वाट वाकडी करायची आणि वारा जिंकला तर पावसाने अतिक्रमण करायचं नाही.” पाऊस म्हणाला, “पावसाशिवाय पृथ्वीवर कुणी जगणारच नाही. माझीच ताकद जास्त आहे. त्यामुळे आधी तू प्रयत्न कर.” वारा म्हणाला,”ठीक आहे.” आणि तो वेगानं वेळूबनात घुसला. वेळू वाकून झुलू लागले, तसं माकड घट्ट धरून बसून राहिलं. वेळूबनातून वाऱ्याची जोरदार भयाण सुरातली शिळ घुमू लागली, तसं माकड भेदरलं, पण त्यानं कान झाकून घेतले. वाऱ्यानं त्याच्या डोळ्यांत कचरा उडवला, तेव्हा डोळे मिटून घेतले; पण ते काही जागचं हललं नाही. अखेर वारा थकला. मग पावसानं ढगावरून उडी टाकून वेळूबनावर कोसळायला सुरुवात केली. वारा बाजूला थांबून शांतपणे बघत होता. जोरदार सरी कोसळल्याने माकड चिंब भिजलं आणि वेळूला अधिकच चिकटून बसलं. वादळ आणि वीज हसू लागले की, वारा तर हरलाच, आता पाउसही हरणार! मग चिडलेल्या पावसानं आपलं स्वरूप बदललं आणि पाण्याच्या थेंबांसोबत गारांचा वर्षाव सुरू केला. गारांचा मारा म्हणजे दगडफेकच! माकडाचं अंग गारांनी चांगलंच शेकून निघालं आणि ते घाईघाईनं खाली उतरून चांगला आडोसा शोधू लागलं. पाऊस जिंकला आणि वारा हरला. पावसानं अभिमानानं वारा जिकडे थांबला होता, त्या दिशेला नजर टाकली, तर वारा निघून गेला होता. वादळ गरगरत समुद्राच्या दिशेने निघालं होतं. वीज गायब झाली होती. सगळ्या वातावरणाचा रंग बदलून गेला होता आणि त्यात तो मऊ निरुपद्रवी ढग विरघळून नष्ट झाला होता. आपण खरंच जिंकलोत का? पावसाला प्रश्न पडला. पण आता वेळ निघून गेली होती. जोरदार वारे आले की, लोक म्हणतात, “आता पाऊस आला पाहिजे.” हे ऐकून वारा उदास होतो. पाऊस त्याला मनवण्याची धडपड करतो. पण क्वचितच ते एकमेकांना भेटतात. सगळ्यांनी मिळून ढगावर बसून गप्पा मारत सैर करणं तर तेव्हापासून बंदच होऊन गेलंय. गोष्टीतून आजही काहीतरी बोध घ्यावा, इतकं भाबडेपण माझ्यात अजून शिल्लक आहे. त्यामुळे एक निश्चय केला... जे खूप जवळचे आहेत किंवा ज्यांच्याविषयी आपल्या मनात खूप आत्मियता आहे, ते अंतरानं कितीही दूर असले तरी मनात अंतर ठेवायचं नाही. आपल्या चुका, आपले दोष, आपल्यातल्या त्रुटी, आपली दु:ख ही त्यांनी स्वीकारलेली असतात... जसं आपण त्यांना पूर्ण आहेत तसे स्वीकारलेलं असतं तसंच. उगीच आपण मनात म्हणत राहतो की माणसं बीझी असतात, त्यांना त्यांचे स्वतःचे व्याप असतात... असतातही तसे; किंबहुना खूप मोठी माणसं असतात त्यांच्या मोठेपणाचंही आपल्यावर दडपण येतं. पण हे सगळं झटकायचं. मैत्रीत, प्रेमात असं छोटंमोठं काही नसतं कुठल्याच स्वरूपाचं. दर आठवड्याला एकमेकांना किमान एक फोन करायचाच करायचा. दुसरं म्हणजे कधी शब्दही सुचत नाहीत, कधी नेमकं बोलता येईल असं वाटत नाही... तरीही बोलायचं - ऐकायचं. अर्धं वाक्य असेल तरी चालेल. मनात काही ठेवायचं नाही. दाबूनदुबून अडवून ठेवले विचार आणि भावना की ते आजार होऊन शरीरात कुठेही उगवतात आणि भराभरा वाढतात, फोफावतात. सुरुवातीला संकोच वाटेल आपल्याच लोकांजवळही, पण थोडा नियमितपणा आला संवादात की सवय होईल. रागलोभ असतातच, ते असू द्यावेत. आपल्या लोकांवर रागलोभ नसतील तर कुणावर असतील? एकाकी झुरण्याहून रागलोभसंतापप्रेम सगळ्याला सामोरं जाणं चांगलं. जुनं काहीतरी मनात ठेवून त्यावर अकारण अडकून बसू नये हेच उत्तम. टोकाचे तापदायक असतील त्यांना मात्र नुसतं अनफ्रेंड नव्हे, तर ब्लॉकच करायचं आयुष्यातही; आपलं एक आयुष्य आहे त्यात कुणाला मिठाचे खडे टाकू देत बसायचं नाही आणि त्यावर मग चिडचिड-रडरडही करायची नाही. ते नाहीतच, नव्हतेच असं समजायचं. काहींना माफ करता येतं, ते मन मोठं करून माफ करून टाकायचं. फार शांत वाटतं. काही काळात मग ते सगळे वाईट चेहरे मनाआड जातात हळूहळू, ज्यांचा विचार करण्यात आपण अकारण आपला मानसिक वेळ वाया घालवत असतो. मग अगदी आपले उरतात त्यांच्यावर भरभरून प्रेम करायचं. काहीही, अगदी परतून त्यांनी आपल्यावर प्रेम करावं अशीही अपेक्षा न ठेवता... आकर्षण तगमग वाढवतं, पण प्रेम फार शांतता - समाधान देतं. आपली माणसं आहेत हे जाणवत राहिलं तर मरणही शांत येतं आणि जगणंही जिवंतपणानं होतं. कामं-व्यवहार होत राहतात मित्रांनो, पण जरा जवळ बसत जाऊ जिव्हाळ्यानं... एक ढग आपली वाट पाहत थांबलाय! फोटो सौजन्य : कविता महाजन