कोरोनाच्या काळानं ‘न भूतो ना भविष्यती’ अशा अनेक गोष्टी दाखवल्या आहेत. ज्यामध्ये केवळ गावातल्या गल्लीपासून ते अमेरिकेल्या व्हाईट हाऊसपर्यंत अनेक बाबींचा समावेश आहे. आपला भारत देश हा विविध संस्कृती आणि परंपरा जपणारा म्हणून ओळखला जातो. अशीच एक 170 वर्षे अव्याहतपणे परंपरा भिवंडी शहरात जपली जाती ती म्हणजे गंगादशहारा उत्सवाची.


यंदा कोरोनामुळे सगळ्याच गोष्टी करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे गंगादशहारा उत्सवावरसुद्धा स्वाभाविकच परिणाम झाला. खरतर गंगादशहारा उत्सव हा भिवंडी शहराच्या सांस्कृतिक मानबिंदुंपैकी एक मानला जातो. 1850 सालापासून ते आत्तापर्यंत जसा सुरु झाला अगदी तसाचा तसा हा उत्सव गावकरी करतात. ज्यात दहा दिवस कीर्तन, प्रवचन, पालखी सोहळा, रुद्राभिषेक, गंगालहरी वाचन, गंगापूजन असा अगदी भरगच्च कार्यक्रम असतो.


गंगादशहारा उत्सव हा ज्येष्ठ प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत करण्याची प्रथा आहे. ज्या गावात नदी किनारी शंकराचे मंदिर आहे अशा ठिकाणीच बहुधा गंगादशहारा उत्सव करण्यात येतो. परंतू भिवंडी शहरात देवळाजवळ नदी नसतानाही हा उत्सव साजरा होतो, हे नवल! या मागच्या इतिहासाचा मागोवा घेतला असता अनेक रंजक गोष्टी समोर आल्या.


भिवंडीत शीलाहारकालीन देवळात वसलेला ‘श्री भीमेश्वर’ हे ग्रामदैवत आणि त्याच्या सभोवती वसलेलं गाव म्हणजे भिवंडी. भिवंडी गावापासून बाहेर सुमारे अडीच किलोमीटर गावकुसाबाहेर असलेला एक नैर्सिगक तलाव आहे, त्याला वऱ्हाळा तलाव म्हणून म्हटलं जातं. या तलावातील पाणी गावकऱ्यांना मिळावे याकरिता माधवराव पेशव्यांनी पुण्याप्रमाणे काज्ञ भिवंडीसाठी एक विशेष पाणी योजना तयार केली होती. परंतू ती काही कारणाने बारगळली.


यानंतर 1850 सालात भयाण असा दुष्काळ पडलेला होता. लोकांना थेंबभर पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत होती. पाण्यासाठी पायपीट सुरु होती. विहिरी आटल्या होत्या. अशावेळी काय करावं असा प्रश्न भिवंडीकरांसमोर उभा ठाकला होता. गावकरी चिंतेत होते. फाल्गूनमध्येच पाण्याची वानवा होती आणि त्यानंतर माघ, चैत्र आणि वैशाख महिने पाण्याविना काढायचे कसे ? या समस्येत गावकरी असताना, त्याकाळी गावातील प्रतिष्ठित मंडळी घुले, कांड आणि मेकल यांनी गावात पाणी आणण्यासाठी पुढाकार घेतला.


माधवराव पेशवेंची बारगळलेली पाणी योजना आपण राबविवण्याचे या मंडळींनी ठरवलं. त्यानंतर अडीच किलोमीटरवर असलेल्या वऱ्हाळा तलावातील पाणी या मंडळींच्या स्वखर्चाने खापरी नळाच्या सहाय्याने भीमेश्वर मंदिराच्या समोरच्या हौदात सोडण्यात आलं आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सरकारी गॅझेटमध्येही याच्या नोंदी आहेत.ऐन वैशाखात त्यावेळी पाणी मिळालं आणि भिवंडीकराच्या आनंदाला पारावर उरला नाही कारण पाणी आलं याचाच अर्थ गंगामाईच आपल्या इथे अवतरली अशीच काहीशी भावना लोकांच्या मनी आली आणि तिथूनच भीमेश्वर मंदिरात उत्सवाचा श्रीगणेशा झाला.


दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात कीर्तन म्हणजे पर्वणीच असते. कारण प्रख्यात कीर्तनकार कराडबुवा, पिल्लू मराठेबुवा, शंकराचार्य विद्याशंकर भारती, राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे, कीर्तनसूर्य दत्तदासबुवा घाग, ते आत्तापर्यंतचे अगदी गावातील कीर्तनकारांपर्यंतच्या उत्कट अविष्कार कीर्तनातून भिवंडीकरांना घ्यायला मिळाला आहे आणि मिळतो आहे, मिळणार आहे.


याशिवाय पालखी परिक्रमा म्हणजे गावातल्या जवळपास सर्वच मंदिरात असे. पण आता कालानुरुप पालखी परिक्रमेत काय तो बदल झाला आहे. यासोबतच रुद्रपठणाची अनुभुती खूप काही देणारी असते. वातावरण 10 दिवस पूर्णपणे भारावून गेलेलं असतं तर असा हा एक वेगळा भक्तीचा उत्सव भिवंडीत अव्याहतपणे सुरु आहे. परंतू या 2020 सालात कोरोना नावाचं मोठं संकट जगावर कोसळलं आणि त्याचा परिणाम याही उत्सवावर झाला. पण याही वर्षी उत्सव संपन्न झाला तो शासनाने दिलेल्या अटी-शर्थी पाळूनच !


खरंतर कुठलाही उत्सव हा त्या गावातल्या लोकांसाठी जिव्हाळ्याचा, आत्मीयतेचा आणि गावची शान जपणारा असतो. समाजातल्या लोकांसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी सुरु झालेल्या असतात आणि परंपरेची ही सांस्कृतिक पालखी मग आपण सारे उचलून हा वसा जपत असतो. अगदी याच उक्तीला अनुसरून ऑनलाईनसारखा पर्याय उपलब्ध असतानाही यावर्षी कीर्तनासह इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.


या जागतिक महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी सांभाळून गरजू व्यक्तींना मदत होईल अशा पद्धतीने उत्सव झाला. देवापुढे रोज गृहपयोगी वस्तू, अन्नधान्य, सौभाग्यलंकार, शालेय उपयोगी वस्तू, स्वच्छतेच्या गोष्टी मांडून त्याची सजावट करण्यात आली आणि परंपरेला धरुन धार्मिक विधी हे सरकारनं घालून दिलेल्या नियमानुसार पार पडले. देवासमोरच्या गोष्टींमध्ये अधिकची भर घालून या वस्तू गरजू व्यक्तींना आणि वनवासी पाड्यावर देण्यात आलेल्या आहेत.


गोष्ट खरतर उत्सव साधेपणाने झाला इतकीच सांगायची होती, पण त्यासाधेपणात पाच पिढ्यांपासूनची परंपरा, प्रतिष्ठा, सामाजिक भान आणि आर्थिकबाबी सहजपणे सांभाळल्या गेल्या आहेत. कारण कुठलाही उत्सव हा समाजाचं प्रतिकात्मक रुप असतो आणि ते आराश्याप्रमाणे प्रतिबिंबित होत असते आणि यातूनच समाजिक मूल्य जपली, जोपासली जातात. याकडे एक प्रातिनिधक उदाहरण म्हणून आपण पाहणं गरजचे आहे. काळानुसार चालायलाच हवं कारण काळानुसार चालताना जुनं संस्कारांचं सोनं हे अधिक झळाळून निघतं. परंतू संकटाच्या काळात उत्सव कसा करायला हवा याचा एक परिपाठच भिवंडीकरांनी घालून दिला आहे.


त्यामुळे यावर्षी कीर्तन राहून गेलं.. पण कीर्तनातून सांगितला जाणारा भाव जपला गेला आणि तोच भाव हा अखंडित राहिला आणि राहिल हा विश्वास !


दीपक पळसुले यांचे अन्य ब्लॉग  :