BMC Mahanagarpalika Election 2025: मुंबईच्या (Mumbai Elections) महापौरपदी खान नव्हे तर मराठी व्यक्तीच विराजमान होईल, असा दावा मुंबई भाजप (Mumbai BJP) अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी केला. याचवेळी मुस्लिम समाजाबाबत बोलताना, "जे मुस्लिम वंदे मातरम् म्हणतील ते आमचे आहेत...", असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. ही त्यांची दोन वक्तव्य चर्चेत असतानाच, पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेसोबत वाटाघाटींसंदर्भात झालेल्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषेदत अमित साटम यांनी पुन्हा एकदा मुंबईचा 'रंग' बदलण्याचा डाव असलेल्यांचे मनसुबे उधळून लावू असा इशारा दिला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केलेल्या विधानांमुळे निवडणूक प्रचाराची दिशा स्पष्ट होत असल्याचं चित्र आहे. महापौरपदाबाबत "खान नव्हे, मराठी व्यक्ती विराजमान होईल", असं वक्तव्य करत भाजपकडून मराठी अस्मिता आणि ओळख हा मुद्दा रेटला जातो आहे का? थेट कोणाचं नाव न घेता करण्यात आलेलं हे विधान अल्पसंख्याक नेतृत्वावर अप्रत्यक्ष भाष्य असल्याचं मानलं जात आहे.
अर्थात याला कारण आहे ते म्हणजे, भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाची आर्थिक राजधानी, 74 हजार कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा सत्तासंघर्ष रंगू लागला आहे. काही लहान राज्यांच्या वार्षिक बजेटपेक्षाही मोठा अर्थसंकल्प असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. बैठकांचा सिलसिला, वाटाघाटी, बॅनरबाजींना ऊत आला आहे. अशातच सगळेच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारादरम्यान विविध अजेंडा सेट करण्यामागे लागले आहेत. अशातच राज्यात सत्तेत असलेला आणि मुंबईसाठी महत्त्वकांक्षा बाळगलेल्या भाजपनं पक्ष संघटनेत अनेक बदल केले. मुंबईचा कॅप्टन म्हणून अमित साटम यांच्यावर धुरा सोपवली. याच अमित साटम यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी विधानं केली आणि त्यांची ही विधानं म्हणजे केवळ प्रसिद्धी, प्रत्यारोपांपुरतं न पाहाता अनेक अर्थांनी बघावं लागणार आहे.
केवळ इतकंच नव्हे तर 150 वर्ष पूर्ण झालेल्या वंदे मातरम् हा विषय सुद्धा या निवडणुकीत गाजणार असं दिसतंय. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत यावर अनेक मतं, मुद्दे मांडले जात असतानाच, "जे मुस्लिम वंदे मातरम् म्हणतील ते आमचे आहेत..." हे वक्तव्य अमित साटम यांनी केलं. या विधानाकडेही केवळ समावेशक संदेश म्हणून नव्हे, तर समाजातील मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. या माध्यमातून देशभक्तीचा निकष मांडून मुस्लिम समाजातही मतदारांचे वेगवेगळे गट निर्माण करण्याची रणनीती असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून "एक है तो सेफ है", "बटेंगे तो कटेंगे" हा नारा पुढे करत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले गेले होते, तोच नारा पुन्हा दिला जातो आहे. या नारामागे विकासापेक्षा सुरक्षा, असुरक्षितता आणि भावनिक मुद्द्यांना प्राधान्य देण्याची भूमिका असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
अशातच "काही जण मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत" हा शब्दप्रयोगही निवडणुकीत महत्त्वाचा ठरत आहे. 'रंग' या शब्दाचा अर्थ स्पष्ट न करता तो मतदारांच्या भावनांवर सोडण्यात आल्यामुळे धर्म, संस्कृती किंवा राजकीय वर्चस्व अशा विविध अर्थांनी हा मुद्दा घेतला जात आहे.
भाजपाकडून शिवसेना ठाकरे गटावर 25 वर्षांच्या सत्तेचा दाखला देत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. मात्र,याच कालावधीत भाजपही अनेक वेळा महापालिकेच्या सत्तेत भागीदार राहिल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांमागे राजकीय जबाबदारीपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही निवडणूक केवळ रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन यांसारख्या महापालिकेच्या कामकाजापुरती मर्यादित राहणार नाही. तर मुंबईची ओळख, सत्तेवरचा दावा आणि राजकीय नरेटिव्ह कोण ठरवणार, यासाठी ही लढाई होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
आर्थिक राजधानी असलेल्या आणि देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या सत्तेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत विकास विरुद्ध ओळख, अनुभव विरुद्ध ध्रुवीकरण असे मुद्दे अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. आणि ज्याच्या हातात बीएमसीची चावी जाणार, त्याला केवळ घोषणा नव्हे तर काम करून दाखवावं लागणार आहे.कारण ही निवडणूक फक्त सत्तेची नाही, मुंबईच्या भवितव्याची!