Nagpur Orange : महाराष्ट्र हे देशात फळबाग उत्पादनात अग्रगन्य राज्य आहे . सध्या आपल्या देशातून फळांची सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रात राज्यातूनच केली जाते. 1990 च्या दशकाच्या सुरवातीला महाराष्ट्रात फळबाग योजना राबवली गेली. त्या माध्यमातून आंबा, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, चिकू, पेरू, केळी, लिंबू अशा अनेक फळांच्या शेती संदर्भात संशोधन झाले. त्या त्या भागातील जमिनीची गुणवत्ता, वातावरण आणि पाण्याची उपलब्धता नुसार उपयुक्त प्रजाती शोधण्यात आल्या. काही जिल्हे किंवा विभागानुसार त्या फळशेतीचे क्लस्टर तयार करण्यात आले. शेतकऱ्यांना कलमाच्या (रोपाच्या) लागवडी पासून तर उत्पादन हाती येईपर्यंत तसेच पुढे पॅकेजिंगपासून तर मार्केटिंगपर्यंतचे सर्व ज्ञान त्या त्या पिकांची फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आले. तशा संशोधन संस्था राज्य सरकारकडून विभागानुसार त्या भागातील शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आल्या. त्यामुळेच आज महाराष्ट्रात फळशेतीतून संपन्नता आली. मात्र या सर्व प्रक्रियेत नागपूरचा संत्रा दुर्लक्षितच राहिला. नागपूरचा संत्रा का दुर्लक्षित राहिला? याला कोण जबाबदार आहे? संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कुठं चुकले? आता पुढे काय करायचे? या सर्व प्रश्नाचा आज आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया. 


दोनशे वर्षांपूर्वी रघुजी राजे भोसले यांनी नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यातून संत्र्यांच्या काही कलम (रोप) सोबत आणल्या होत्या. तेव्हा पासून नागपूर आणि लगतच्या प्रदेशात संत्र्याच्या फळ शेतीला सुरवात झाली. मात्र आजही आपले शेतकरी तेच दोनशे वर्षापूर्वीच्या प्रजातीच्या संत्र्याचे वाण शेतात लावतात. आजपर्यंत नागपूरच्या संत्र्यांच्या या प्रजातीवर संशोधन तर झाले, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही. याच उदाहरण सांगायचं झालं तर आपला नागपूरचा संत्रा ज्याला आपण  "ऑरेंज" म्हणून ओळखतो तो मुळात ऑरेंज नसून 'मँडारिन' प्रकारात मोडणारा संत्रा आहे. जगातला ज्याला 'ऑरेंज' म्हणतात तो वेगळा संत्रा आहे. हा मँडारिन आणि ऑरेंज मधील मूलभूत फरक आपल्याकडील अनेकांना माहीतच नाही. जगात मँडारिन संत्र्याची वेगळी बाजापेठ आहे, चीन त्याचा प्रमुख उत्पादक देश आहे तर ऑरेंज संत्र्याची वेगळी बाजारपेठ आहे, ब्राझील त्याचा प्रमुख उत्पादक देश आहे. 
         
ऑरेंज म्हटलं की तो नारंगी रंगाचा असतो, मात्र आपला नागपूरचा संत्रा (मँडारिन) हिरवा किंवा पिवळा आहे. ऑरेंज संत्रा गोड असतो, मात्र नागपूरचा संत्रा आंबटगोड आहे. जगात ऑरेंजचे वेगवेगळे वाण उपलब्ध आहे त्यात सीडलेस, बट्टीदार, कमी पाण्यात येणारा संत्रा, वातावरणानुसार त्याचे वेगवेगळे वाण आहेत. असेच चीनमधील मँडारिनचे वेगवेगळे वाण आहेत. मात्र आपल्या नागपूर संत्रा (मँडारिन) उत्पादक शेतकऱ्यांजवळ वातावरण अनुकूल आणि आपल्या संत्र्याच्या मार्केट उपयुक्ततेनुसार वाण उपलब्ध नाही. त्यामुळे आपले शेतकरी तेच पारंपरिक मिश्रित वाण लावतात. आपल्या नागपूर संत्र्याची (मँडारिन) युनिक चव सोडली तर इतर जागतिक बाजापेठेतील स्पर्धात्मक गुणधर्म नाही. त्यामुळे जागतिक स्तरावर नागपूरच्या संत्र्याला विशेष मागणी येत नाही. 


या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना माहितीच नाही. हे सांगणारी राज्याची अधिकृत संस्था नाही.  महाराष्ट्रात आंबा, द्राक्ष, डाळिंब, चिकूसह इतर फळ पिकाच्या शेतीत जी क्रांती झाली ती संत्रा शेतीत होऊ शकली नाही. कारण इतर फळ पिकांसाठी राज्य सरकारच्या संशोधन संस्था आहे. या संस्था वाणावरील  संशोधनासोबत मार्केटिंग व सेलिंग स्टॅटेजीचा अभ्यास करून त्याची माहिती शेतकऱ्यांना देतात. त्या त्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून आपल्या शेतकऱ्यांसाठी ते करून घेतले. संत्रा उत्पादक पट्ट्यातील लोकप्रतिनिधींनी त्याकडे कधी लक्षच दिले नाही. केंद्राची लिंबूवर्गीय अनुसंधान संस्था नागपूरला आहे, ती देश पातळीवरचे संशोधन करते, त्यांच्याकडे काही विशिष्ट वाण देखील आहे. मात्र कोणत्या प्रजातीचे वाण कोणत्या भागात लावायचे? त्याचे संवर्धन कसे करायचे? त्या विशिष्ट प्रजातीच्या वाणाचे जागतिक मार्केट मध्ये किती मागणी आहे? क्लस्टरचे काय फायदे असतात? आपल्या स्थानिक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये याबाबत विशेष जागृतीच नाही. दुसरी महत्वाची गोस्ट सरकारवर व स्थानिक लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करण्यासाठी ज्याप्रकारे उर्वरित महाराष्ट्रात इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना आहे, तशी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची एखादी संघटना देखील नाही. त्यामुळे या ना अनेक कारणांनी नागपूरचा संत्रा कायम दुर्लक्षित राहिला व जागतिक स्तरावर सतत पिछाडत गेला. 
      
जागतिक स्तरावर नागपूरच्या संत्र्याची तुलना करायची झाली तर अनेक बाबीत आपण पिछाडीवर आहे. जगात ब्राझील, इस्त्रायल, अमेरिका, स्पेन, चीन, मेक्सिको, मोरोक्को, इजिप्त हे प्रमुख संत्रा उत्पादक राष्ट्र आहेत. या देशात संत्रा वाणानुसार मार्केटमध्ये येतो व विकला जातो. त्यात सीडलेस वाण, टेबल फ्रुट वाण, प्रक्रिया उद्योगासाठी आकाराने सारखा असलेल्या संत्र्याचे वाण, भरीव बट्टीदार, चमक असलेला असे वेगवेगळे वाण आहे. प्रति हेक्टर त्यांच्या संत्र्याची उत्पादकता ही 40 ते 60 टनापर्यंत आहे. तर आपला मँडारिन संत्रा हिरवा किंवा पिवळा असतो, आकार वेगवेगळा असतो, बोण्डयुक्त फुसफुसीत असतो, चव आंबट गोड आहे व आपल्या संत्राची उत्पादकता हि प्रति हेक्टर फक्त 5 ते 7 टनापर्यंत आहे. यात आपली निर्णयात अत्यंत नगण्य, म्हणजे जवळपास शून्याच्या घरात आहे. इतका फरक आपल्यात व विदेशातील प्रमुख संत्रा उत्पादक राष्ट्रात आहे. 


या राष्ट्रांनी संशोधन करून त्यांच्या जमिनीचा प्रकार, वातावरण व पाण्याच्या उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातीचे वाण शोधून काढले. खाण्यासाठी टेबलफ्रूट म्हणून संत्र्याची वेगळी जात, प्रक्रिया उद्योगासाठी संत्राची वेगळी जात, कॉस्मॅटिक उद्योगात वापरल्या जाणाऱ्या संत्र्याच्या साली साठी वेगळी जात या नुसार संशोधन केले आहे. त्यानुसार तसे वाण त्या त्या देशाने आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. त्यानंतर त्याचे हजारो हेक्टरचे क्लस्टर तयार करून घेतले. त्याचे व्यवस्थित नियोजन करून घेतले. उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढवली. उदाहरण सांगायचे झाले तर अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, टेक्सस व फ्लोरिडा या तीन राज्यात संत्र्याची शेती केली जाते. मात्र कॅलिफोर्नियात फक्त टेबल फ्रुट संत्र्याचे क्लस्टर तयार केले तर फ्लोरिडा व टेक्सस मध्ये ज्यूस साठी लागणाऱ्या सीडलेस संत्र्याचे क्लस्टर तयार केले. त्यामुळे बाजापेठेतील मागणी नियंत्रित केली जाते. या देशात शेतकऱ्यांना अनुदानावर ड्रीप उपलब्ध करून दिले जाते, निघालेल्या संत्र्याची पॅकेजिंग, वॅक्सीन केली व पुढे मार्केटिंग केली जाते. त्यामुळे त्यांच्या संत्राला आंतराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी असते. त्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न होते वरून भाव देखील अधिक मिळतो त्यामुळे ते शेतकरी अधिक नफ्यात असतात. त्यांच्या सरकारांनी  वाणापासून तर मार्केटचा अभ्यास करून हे परिवर्तन घडवून आले . मात्र आपले शेतकरी दोनशे वर्षापासून तेच ते 'मँडारिन' संत्र्याचे पारंपरिक वाण लावत आहे. 
      
ही परिस्थिती सुधारायची असेल तर सुरवात राज्य सरकारला करावी लागेल. पहिले काम इतर फळ पिका प्रमाणे संत्र्यांसाठी संशोधन संस्था काढावी लागेल . ही संस्था सर्व बाबीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल. नागपूर व लगतच्या भागातील जमिनीचा अभ्यास, वातावरणाचा अभ्यास व पाण्याची उपलब्धता या नुसार संशोधन करून नवीन प्रजातीचे वेगवेगळे वाण शोधून काढावे लागेल किंवा आपल्या केंद्रीय संशोधन संस्थेकडे जे वाण उपलब्ध आहे त्यातले आपल्या शेतकऱ्यांसाठी योग्य वाण कोणते हे आधी शेतकऱ्यांना समजावून सांगावे लागेल. शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्याचे विभागनिहाय्य योग्य मार्केटच्या मागणी नुसार वाणाचे क्लस्टर उभे करून घ्यावे लागेल. टेबल फ्रुट चे वेगळे क्लस्टर, प्रक्रिया उद्योगासाठी सीडलेस चे वेगळे क्लस्टर, हे तयार झाले की इतर संसाधनाच्या मदतीने संत्र्याच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होईल. फळ हाती आले की त्यासाठी वॅक्सीन व पॅकेजिंगचे केंद्र उभारावे लागेल. हे सर्व काम शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांकडून करून घेण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्थापन केलेल्या संत्रा संशोधन संस्थेचे असेल. जशा राज्यातील इतर फळ पिकांच्या संस्था करतात. 


पुढे टेबलफ्रूट व प्रक्रिया उद्योग त्यांच्या त्यांच्या मार्केट मागणी नुसार नियोजित मार्केटिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्याला आपले निर्धारित उद्दिष्ट गाठता येईल. आपल्याकडे एकदा का सीडलेस संत्रा उपलब्ध झाला तर प्रक्रिया उद्योगासाठी मार्ग देखील अधिक सोपा होईल. महाराष्ट्रातील डाळिंब, द्राक्ष, आंबा त्याचे उत्तम उदाहरण आहे. पंचवीस  वर्षा आधी महाराष्ट्रातल्या द्राक्ष, आंबा, डाळिंबाची देखील संत्र्यासारखीच परिस्थिती होती, मात्र संशोधन व नियोजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले डाळिंब, केसर आंबा, द्राक्ष आज जगात सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या नफ्यात देखील मोठी वाढ झाली. संत्र्यांसाठी देखील असेच नियोजन करणे हि राज्य सरकारची नैतिक नाही तर कायदेशीर देखील जबाबदारी आहे. सरकारी स्तरावर हे तंत्र माहित आहे मात्र नियोजन व अंमलबजावणी चा आभाव आहे. हे करून घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे तितकेच गरजेचे आहे. 


संत्रा हे आरोग्य वर्धक फळ आहे, लहान मुलांपासून तर सर्वच वयोगटातील लोकांना याचे सेवन करता येते, यात शुगर नसल्याने मधुमेह असलेली व्यक्ती देखील संत्रा खाऊ शकते, पोटॅशिअम नसल्याने हृदयरोगाचे रुग्ण देखील संत्रा खाऊ शकतात. मात्र आपण संत्र्याची ही महत्ता आपल्याच लोकांना पटवून देऊ शकलो नाही, त्यामुळे आजही आपल्याला नागपूरचा संत्रा रस्त्यावर विकताना दिसतो. न्यूझिलंडवरून येणारे 'किवी' फळ फक्त त्यांच्या आरोग्यवर्धक प्रचारामुळे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात विकले जाते. शेवटी न्यूझिलंडने हे ग्लोबल मार्केट व मार्केटिंग स्टॅटेजीने शक्य करून दाखवले. आपल्याला संत्र्यांसाठी असेच करावे लागेल, ग्लोबल आर्थिक मार्केटचा विचार करून आरोग्यवर्धक संत्रा फळ शेती करावी लागेल, तशीच मार्केटिंग देखील करावी लागेल. तरचं विदर्भात संत्रा शेतीत क्रांती येईल व ही शेती अधिक फायद्याची ठरेल. हे शक्य आहे ते संशोधन व राज्यच्या नियोजनाच्या जोरावर, महाऑरेंजच्या माध्यमातून मागच्या काही वर्षापासून काही शेतकऱ्यांनी असे प्रयत्न सुरु केले. मात्र त्याला चळवळीचे स्वरूप येणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागेल.