ब्रिस्बेनच्या मैदानात आज जे घडलं, ते अंगावर रोमांच उभं करणारं होतं. भारतीय कसोटी संघाच्या ओरिजिनल प्लेईंग इलेव्हनमधील फक्त रहाणे, पुजारा आणि फार तर रोहित शर्मासारखे दोन-तीन अनुभवी खेळाडू खेळत होते. बाकी आठ जण कसोटी क्रिकेटमध्ये नुकतंच पाऊल टाकणारे. त्यातले सुंदर, नटराजनसीरखे तर कसोटी क्रिकेटमधील दुधाचे दातही न पडलेले. म्हणजे पदार्पण करणारे. अशा प्लेईंग इलेव्हनने ऑसी भूमीवर त्यांचेच दात घशात घातले.


ज्या गोलंदाजांवर कसोटी सामना जिंकण्यासाठी फलंदाजांइतकीच भिस्त असते. त्या गोलंदाजांमधील सिराज, नटराजन, शार्दूल ठाकूर आणि सैनी या चौकडीचा अनुभव फारच तुटपुंजा. म्हणजे या मॅचच्या पहिल्याच दिवशी एक आकडेवारी दाखवली होती. ऑस्ट्रेलियाचे स्टार्क, कमिन्स, हेझलवूड आणि लायन या चौघांच्या मिळून 1013 विकेट्स. तर, भारतीय आक्रमणाच्या 13 विकेट्स.


हा आकडा किती मोठा फरक सांगणारा होता. तरीही तो नवखेपणा खेळात कुठेही दिसला नाही. किंबहुना वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या डावात बाद होताना खेळलेला फटका वगळता पूर्ण मॅचमध्ये दाखवलेली परिपक्वता, टेम्परामेंट राहुल द्रविडसारख्या महान खेळाडूची आठवण करुन देणारी होती. ब्रिस्बेनच्या असमान उसळी असलेल्या, क्रॅक्स डेव्हलप होत असलेल्या विकेटवर सुंदरने नावाप्रमाणेच सुंदर फलंदाजी केली. तीही शार्दूल ठाकूरसारख्या गोलंदाजाला सोबत घेत. सहा बाद 186 वर आणखी एखादी विकेट गेली असती तर कांगारुंना दीडशेच्या आसपास आघाडी नक्की मिळाली असती. तिथून मग भारतासाठी विजयाचा पर्याय जवळपास बंद झाला असता. पण, या दोघांच्या पॉझिटिव्हिटीने ऑसी आक्रमणाला घाम फोडला. या जोडीने भारताला 336 वर नेलं आणि सामन्यात नवी जान आली.


असं असलं तरीही शेवटच्या दिवशी या खेळपट्टीवर 328 चं टार्गेट सोपं नव्हतं. त्यात ब्रिस्बेनवर कांगारु तीन दशकाहून अधिक काळ कसोटी सामना हरलेले नाहीत. चौथ्या डावात कमिन्स आणि कंपनीसमोर खेळपट्टीवर टिकाव धरणंही आव्हानात्मक होतं. पण, ज्याचा उल्लेख विवेक राझदानसह बहुतेक सर्व हिंदी कमेंटेटर्सनी केला की, ही टीम आज सकाळी मैदानात उतरली तेव्हा ड्रॉच्या माईंटसेटने नव्हे तर जिंकण्याच्या उद्देशानेच. गिलच्या 146 चेंडूंमधील 91 रन्स असतील किंवा मग रहाणेच्या 22 चेंडूंमधील 24. इरादे स्पष्ट होते. आम्ही जिंकण्यासाठीच खेळतोय. एका कमेंटेटरने खेळ सुरु असताना कोच रवी शास्री यांचाही उल्लेख केला. तो कमेंटेटर म्हणाला, जेवढं मी रवी शास्त्रीला ओळखतो, तोही या टीमला जिंकण्यासाठीच प्रेरित करत असणार. रवी शास्त्री यांनी पोस्ट मॅच कमेंट्समध्ये याचं क्रेडिट कोहलीलाही दिलं. ते म्हणाले, कोहली आता जरी टीममध्ये नसला तरी तो सतत त्याच्या पॉझिटिव्ह आणि अटॅकिंग अॅप्रोचने आमच्यासोबत आहे. त्याने हा अॅप्रोच टीममध्ये लोणच्यासारखा मुरवलाय.


त्या मुरलेल्या लोणच्याने ऑस्ट्रेलीयाची मात्र चव घालवून टाकली. या चौथ्या डावात खेळताना ऋषभ पंतच्या मॅच्युरिटीलाही दाद द्यावी लागेल. तो नेहमी जसा फटके मारत सुटतो, तसा काही अपवाद वगळता मारत सुटला नाही. जेव्हा टार्गेट साडेचार-पाच रन्स प्रति ओव्हर होतं, तेव्हा त्याने ज्या चेंडूंना सन्मान द्यायचा तिथे तो दिला. गियर बदलणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. पंतने या मॅचमध्ये ते करुन दाखवलं आणि निकाल आपल्यासमोर आहे. त्याला यष्टीरक्षणात मात्र सुधारणा करावी लागेल.


पाचव्या दिवशी पुरतं बोलायचं झाल्यास भारतीय माईंडसेट विजयाचा असताना कांगारुंचा मात्र काहीसा बचावात्मक वाटला. खास करुन दोन-अडीच तास बाकी असताना त्यांनी केलेली फिल्ड प्लेसमेंट पाहून असं वाटलंच नाही की, ते जिंकण्यासाठी खेळतायत. ते ड्रॉसाठी खेळतायत असं वाटतं होतं. जेव्हा खेळपट्टीला तडे गेलेत, तेव्हा लायनसारख्या गोलंदाजाला विकेट्स घेण्यासाठी प्राधान्य देत त्यांनी आक्रमक क्षेत्रव्यूह द्यायला हवा होता. तेव्हा त्यांनी डीप मिडविकेट, डीप मिडऑन लावून धावा वाचवल्या. ऑसी अॅटिट्यूडचा विचार केल्यास ही गोष्ट फारच चकित करणारी होती.


ऑस्ट्रेलियाच्या फुल स्ट्रेंथ आणि बेस्ट बोलिंग अटॅकसमोर दोनदा जिंकलो, एक मॅच तिखट वेगवान मारा अंगावर घेत ड्रॉ केली, ही बाब छाती अभिमानाने आणखी फुलवणारी आहे. रहाणे, पुजारासोबत यंगिस्तान टीम इंडियाने दाखवलेली जिगर, ती पोलादी वृत्ती सारचं विस्मयचकित करणारं होतं. गेल्या कसोटीत अश्विन, विहारीने दाखवलेला चिवटपणा, अंगावर झेललेले वार, तर या कसोटीत पुजाराचं अंगही कांगारुंच्या आक्रमणाने शेकवून काढलेलं. तरीही पुजाराच्या चेहऱ्यावर, निग्रही वृत्तीमुळे त्याचे व्रण कुठेही जाणवले नाहीत. तेव्हाच कुणीतरी मला हिंदीतल्या दोन ओळी ऐकवल्या, त्यात बदल करुन मला इथे म्हणावंसं वाटतं, "जो पानी से नहाते है, वो लिबास बदलते है..मगर जो पसीने से नहाते है, वो इतिहास बदलते है.."


ब्रिस्बेनच्या भूमीवर भारतीय टीमने असाच घाम गाळून, दुखापतग्रस्त होताना काहींनी जणू रक्त सांडून हा इतिहास रचला. खास करुन एडलॅडच्या मैदानावर 36 ला ऑलआऊट झाल्यानंतर जो कमबॅक या टीमने केलाय, त्याला स्टँडिंग ओव्हेशनच द्यायला हवी. जेव्हा प्रत्येक मॅचमध्ये आपला एक बॉलर म्हणजे पहिली कसोटी झाल्यावर शमी, दुसरी झाल्यावर उमेश यादव, तिसरी झाल्यावर बुमरा हे एकापाठोपाठ एक दुखापतग्रस्त झाले. तरीही टीम परफॉर्मन्सचा आलेख चढताच राहिला. ही भारतीय बेंच स्ट्रेंथ, डोमेस्टडिक क्रिकेटच्या दर्जाची कमाल तर आहेच. त्याच वेळी यासाठी रहाणेच्या कॅप्टन्सीला पैकीच्या पैकी मार्क्स दिले पाहिजेत. त्याचे बोलिंग चेंजेस, फिल्ड प्लेसमेंट, त्याचं टीम सिलेक्शन. खास करुन शेवटच्या कसोटीत अश्विनच्या जागी जेन्युईन स्पिनर म्हणजे कुलदीप यादव खेळवण्याचा मोह कदाचित होऊ शकला असता. पण, टीममध्ये त्याने बोलिंग ऑलराऊंडरला म्हणजेच वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य दिलं. त्याने या संधीचं सोनं नव्हे तर सोनं, प्लॅटिनम, हिरा सारं काही करुन दाखवलं. त्याचा बर्फालाही लाजवणारा कुलनेस, त्याचं शॉट सिलेक्शन, दुसऱ्या डावात त्याने धोकादायक ठरु शकणाऱ्या वॉर्नरची घेतलेली विकेट. सारं काही या सिलेक्शनला पूरक होतं.


त्याच वेळी मोहम्मद सिराजचीही पाठ थोपटायला हवी. वडिलांचं निधन, त्यात मैदानात असताना त्याला झालेली शेरेबाजी अशा एकामागोमाग घटनांनी एखादा नवीन खेळाडू कदाचित मानसिकदृष्ट्या थोडा खचू शकला असता. पण, सिराजने या फॅक्टर्सना मोटिव्हेशनमध्ये कन्व्हर्ट केलं. अखेरच्या डावातील त्याने घेतलेल्या पाच विकेट्सनी हे टार्गेट साडेतीनशे पार गेलं नाही. त्याने दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथला ज्या चेंडूवर बाद केलं, तो चेंडू तर जगातील तमाम वेगवान गोलंदाजांची कॉलर टाईट करणारा होता.



तीच गोष्ट शार्दूल ठाकूरची. मुंबईकर खेळाडूंना खडूस हा टॅग चांगल्या अर्थाने नेहमी लावला जातो. शार्दूलने ही खडूसगिरी पहिल्या डावात फलंदाजीत दाखवली. तसंच दुसऱ्या डावात मोक्याच्या क्षणी चार विकेट्स घेतल्या. या मालिका विजयात यंगिस्तानची कामगिरी चांगलीच लक्षात राहील. मला या मालिकेतील परफॉर्मन्स 2001 च्या त्या मालिकेतील कामगिरीच्या तोडीचा वाटतो. जेव्हा स्टीव्ह वॉची टीम सलग 16 कसोटी जिंकून भारत भूमीवर आली होती. वानखेडेची मॅच गुंडाळत सीरीज जिंकायला आतुर होती. तेव्हा कोलकाता कसोटीत लक्ष्मण, द्रविड, हरभजनने मॅच 360 डिग्री फिरवली आणि भारताला यादगार विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियन भूमीत धूळ चारणं तेही बाऊन्सी विकेटवर, असमान उसळी असणाऱ्या खेळपट्टीवर. आपली नवखी टीम असताना आणि त्यांची फुल स्ट्रेंथ साईड असताना. ही गोष्टच गुदगुल्या करणारी, सातवे आसमान पर वगैरे नेणारी आहे.



या मालिकेने कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी दिलीय, असंही म्हणता येईल. टी-ट्वेन्टी, वनडे क्रिकेट बहरात असताना टी-टेन नावाचा नवा फॉरमॅट उदयाला येत असताना कसोटी क्रिकेट इतकं थ्रिलिंग, इंटरेस्टिंग होऊ शकतं, हे या मालिकेने प्रूव्ह केलंय. कसोटी क्रिकेट हे क्रिकेटच्या अस्सलतेचं रुप आहे. त्यामुळे ते टिकण्यासाठी अशा मालिका, असे सामने नक्कीच मोलाचे ठरतील.


क्रिकेट हा भारतात असा खेळ आहे, जिथे आपल्या भावना, आपलं मन गुंतलेलं असतं. कोरोनाच्या कठीण काळातून जाताना सर्वांच्याच मानसिक कणखरतेची परीक्षा झाली, अजूनही काही प्रमाणात ती सुरु आहे. यंग टीम इंडियाने त्यांची परीक्षा क्रिकेटच्या मैदानात डिस्टिंक्शनने उत्तीर्ण होत या आघात झालेल्या मनांवर नक्कीच सकारात्मकतेची फुंकर घातलीय. कठीण काळातून बाहेर येताना या यंग टीमकडून लढण्याची, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याची प्रेरणा घेऊया आणि आपणही कोरोनाला हद्दपार करताना म्हणूया. ऐतिहासिक, अविस्मरणीय विजय. अजिंक्य भारत.


अश्विन बापट यांचे अन्य ब्लॉग : 



BLOG | आता ग्रिप सोडू नका...


BLOG | कसोटी नेतृत्वाची, परीक्षा फलंदाजांची