बिग बी अमिताभ बच्चन यांनी नुकतेच केबीसीचे हजार एपिसोड पूर्ण केले. कन्या श्वेता आणि नात नव्या नंदा यांच्या खास उपस्थितीत हजाराव्या एपिसोडचं सेलिब्रेशन झालं. कौंटुबिक वातावरणात हा एपिसोड पार पडला. जया बच्चन यांच्यासहदेखील बच्चन यांनी संवाद साधला. खुसखुशीत गप्पा झाल्या, टोलेबाजीही झाली. वर्ष 2000 मध्ये सुरू झालेल्या या शोच्या 13 व्या सीझनमध्ये बिग बींनी एक हजार एपिसोडचा माईलस्टोन गाठला.


वय वर्षे 79, अनेक व्याधींनी ग्रासलेलं शरीर, त्यातच गेल्या वर्षी कोरोनासारख्या आजाराशी केलेला मुकाबला असं सगळं असताना हा माणूस ज्या सातत्याने अथक काम करतोय, ते विस्मयचकित करणारं आहे. केबीसी सुरु असतानाच झुंड सिनेमाचं शूट, ब्रह्मास्त्र आदी सिनेमेही रांगेत आहेत. असं असतानाच बिग बी त्याच ऊर्जेने केबीसी शो प्रेझेंट करताना पाहायला मिळतात. लहान मुलांशी मूल होऊन समरस होतात. तरुणांशी संवाद साधताना त्यांची वेव्हलेंग्थ पकडतात. तर ज्येष्ठांशी बोलताना त्यांच्या जगण्याचा एक भाग होऊन जातात. हे सारं करताना त्यांचा समोर बसलेल्या पाहुण्यांबद्दलचा आदर, त्यांच्या बोलण्यातली अदब, ग्रेसफुलनेस हे सारं केवळ अचंबित करुन जातं.


याच निमित्ताने केबीसीच्या आणि अमिताभ यांच्याही करिअरच्या फ्लॅशबॅकमध्ये डोकावलो तर त्यांनी केलेला संघर्षही डोळ्यासमोर येतो. म्हणजे केबीसीची सुरुवात करतानाचा तो काळ आठवा. साधारण 1998 ते 2000 च्या दरम्यानचा. बच्चन यांची एबीसीएल कंपनी पुरती डुबलेली. आर्थिक अडचणींच्या खाईत अडकलेले अमिताभ. सोबतच लाल बादशहा, सूर्यवंशम, मृत्यूदाता, कोहरामसारख्या फ्लॉप सिनेमांची मालिका.


संकटांनी चहूबाजूंनी घेरा दिला होता. पूर्णपणे नाऊमेद होण्याचीच स्थिती जणू. पण, बिग बींच्या अँग्री यंग मॅनने अनेकदा पडद्यावर अनेक व्हिलनना आपल्या स्टाईलमध्ये नेस्तनाबूत केलं, तसंच या संकटरुपी व्हिलननाही बिग बींनी आपल्या जिगरबाज वृत्तीने पाणी पाजलं.


केबीसीने बिग बींच्या आयुष्यात एन्ट्री घेतली आणि एक नवा इतिहास घडला. हा शो त्यांच्यासाठी कमबॅक ठरला. वयाची साठी पार  केल्यानंतर अशी मुसंडी मारणं हे अमिताभच करु जाणे. केवळ स्वत:वरच्या क्षमतेवर विश्वास ठेवत, नेव्हर से डाय एटिट्यूड दाखवत बिग बींनी बाऊन्स बॅक केलं. हा शो केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात अढळस्थानी राहिला. अमिताभ यांचा खर्जातला आवाज, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व, समोरच्या स्पर्धकाला मग तो कोणत्याही वयोगटातला असो अमिताभ देत असलेला रिस्पेक्ट. मग ते अगदी लहान मुलालाही आप असं संबोधणं असो किंवा स्पर्धकाला खुर्चीत अदबीने बसवणं.


हा शो बच्चन यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. अभिनय करणं आणि अँकरिंग करणं या दोन वेगळ्या खेळपट्टीवरच्या मॅचेस आहेत. बिग बींच्या अभिनयाची चौफेर फटकेबाजी आपण सारेच पाहत आलोय. त्याच वेळी अँकरिंगच्या पिचवर त्यांनी केलेली बॅटिंगही मनाला सुखावणारी होती.


आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेल्या अमिताभ यांचं फायटिंग स्पिरिट आपण जाणतोच. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात आवाज चांगला नसल्याचं कारण देत रेडिओवर त्यांना मिळालेला नकार असो किंवा मग कुलीच्या सेटवर शूटच्या वेळी झालेली गंभीर दुखापत असो. दोन्ही प्रसंग जरी वेगळ्या वेळी घडलेले असले तरी मनोधैर्य खच्ची करु शकणारे होते. 'ग्रेट पीपल डोन्ट डू डिफरन्ट थिंग्ज, दे डू द थिंग्ज डिफरन्टली' या उक्तीनुसार, अमिताभ यांनी आयुष्यात आलेली अशी अनेक संकटं आव्हान म्हणून स्वीकारली, त्याचा सामना केला आणि त्यातून ते नुसते बाहेर आले नाही तर त्यांनी विजयी मोहोर उमटवली. त्यांच्याच 'दीवार' सिनेमात जसे गोदामाचं कुलूप तोडून ते बाहेर येतात तसे.


अमिताभ यांचा करिअर ग्राफ आपल्याला स्तिमित करतो. थक्क करतो. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ज्या ऊर्जेने, पॉझिटिव्हीटीने ते कार्यरत आहेत, त्याला केवळ सलाम. म्हणजे पाहा ना, अमिताभ यांना ज्येष्ठ असलेले धर्मेंद्र यांच्यासारखे कलाकार सध्या निवृत्तीचं जीवन छान एन्जॉय करतायत. तर, त्यांच्या नंतरच्या पिढीतील शाहरुखसारखे सुपरस्टार्सही तुरळक सिनेमेच करताना दिसतात. अगदी रणबीर, रणवीर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, विकी कौशलसारखे ताज्या दमाचे कलाकारही एकमेकांकडून असलेल्या अतिशय कडव्या स्पर्धेला सामोरं जाताना दीर्घकाळ राज्य करु शकलेले नाहीत. या साऱ्यांमधला एक सणसणीत अपवाद म्हणजे फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन. जंजीर, दीवार, शोले, शराबी किती नावं घ्यायची. या सिनेमांची आपली पारायणं करुन झालीत. मधला संघर्षाचा काळ वगळता अमिताभ यांच्या फिल्म करिअरचा सेकंड हाफही अफलातून आहे. पा, ब्लॅक, चीनी कम, पिकू, सरकार यासारखे जबरदस्त हिट सिनेमे वयाच्या साठीनंतर या माणसाने दिलेत. ज्यामध्ये नि:शब्दसारखा खूप वेगळा सिनेमादेखील आहे. त्याच वेळी अमिताभ छोट्या पडद्यावरही अँकरच्या भूमिकेतून तो पडदा व्यापून राहिलेत. आज केबीसीच्या हजार एपिसोडच्या निमित्ताने हे सारं मनात दाटून आलं. याच वेळी ज्येष्ठ सिने लेखक दिलीप ठाकूर यांनी त्यांच्याबद्दलचा सांगितलेला एक किस्साही आठवला. एका पत्रकार परिषदेत अमिताभ यांना प्रश्न विचारण्यात आला, एकही समय फिल्म, केबीसी, अडव्हर्टाईजमेंट इतना सारा काम कैसे मॅनेज करते हो..तेव्हा बच्चन यांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आणि आपल्या सगळ्यांनाच मोठी शिकवण देणारं होतं. ते म्हणाले, मै काम मॅनेज नही करता, मै टाईम मॅनेज करता हूँ, काम अपने आप मॅनेज करता हूँ. हॅट्स ऑफ टू बिग बी. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. याच शुभेच्छा.