माणूस कशामुळे मरतो???


 

म्हातारं झालं की माणूस मरून जातो किंवा मग खूप आजारी पडलं, योग्य वेळेत योग्य उपचार नाही मिळाले तर मग माणूस मरून जातो. हे असं लहानपणी ऐकलेलं...

पण आता ही वाक्य अक्षरशः कालबाह्य झाल्यासारखी वाटतात. कारण आता माणसाला मरायला कोणत्याही कारणाची गरज नाही. किंबहुना ती गरजच उरलेली नाही.

अलीकडची माणसं मरण्याची काही उदाहरणं पाहिली तरी त्याची खात्री पटते.

अचानक जुना पूल पडून माणूस मारतो.

बांधकाम सुरू असलेला पूल कोसळतो आणि माणसं मरतात

आकाशातून चाललेलं विमान जमिनीवरील माणसाच्या अंगावर पडूनही माणूस मरतो.

ड्रेनेजचं झाकण उघडं राहिलं म्हणून त्यात पडून माणूस मरतो.

रस्त्यावरून चालताना अंगावर झाडाची फांदी पडून माणूस मरतो.

रेल्वे स्टेशनवर, यात्रेमध्ये गर्दीत चेंगराचेंगरी मध्ये मरतो.

गेल्यावर्षीचा एल्फिन्स्टनरोड रेल्वे स्टेशनचा किस्सा ऐकला तर  कळतं की माणूस अफवेनं सुद्धा मारतो...

यात पुण्यात घडलेल्या घटनेची भर...

होर्डिंगचा सापळा अंगावर पडून चार मुत्यू...

म्हणजे या बिचाऱ्यांची चूक तरी काय???

दुपारी दोन ते तीनच्या दरम्यानची घटना. काही कामानिमित्त बाहेर जात असतील, काहीजण कामं आवरुन घरी जात असतील. सिग्नलला थांबले आणि त्यांचं आयुष्यच थांबलं... कायमचं.

त्यांपैकी एका रिक्षाचालकाच्या पत्नीचं आदल्याच दिवशी निधन झालेलं, आळंदीला पत्नीच्या अस्थी विसर्जन करून ते नुकतेच परतत होते, तेवढ्यात काळानं झडप घातली.

पण हा काळाचा घाला होता की प्रशासनाचा निष्काळजीपणा???

ते होर्डिंग कापण्याचं काम सुरू होतं, पण होर्डिंग्जचे अँगल वरून कापत येण्याऐवजी त्या बिनडोक माणसांनी डायरेक्ट मुळावर घाव घातला आणि चार जीव हकनाक गेले.

पण या प्रत्येक घटनेकडे लक्षपूर्वक पाहिलं तर यातली कुठलीच आपत्ती नैसर्गिक नव्हती.

पूल पडले ते नीट ऑडिट न झाल्यानं किंवा निकृष्ट कामामुळं

विमान पडलं, पण त्यापूर्वी सहपायलट मारिया झुबेर यांनी पतीला फोन करुन वातावरण उड्डाणाला अनुकूल नसल्याचं कळवलं होतं.

आपल्या घरात पाणी शिरू नये म्हणून तिथल्या काही रहिवाशांनी ड्रेनेजचं झाकण परस्परच काढलं होतं. काहीठिकाणी पालिकेचे लोकही असा निष्काळजीपणा दाखवतात.

झाडाची फांदी अंगावर पडते, कारण पालिकेकडं तक्रार करूनही त्या वाढलेल्या फांद्या कापल्या जात नाहीत, वाढलेल्या व धोकादायक झाडाची तोडणी करण्याचं काम पालिकेचं असतं.

एलफिस्टनरोड रेल्वे स्टेशनच्या जिन्यामध्ये चेंगराचेंगरी झाली ती अफवेमुळं...

फूल पडलं, फूल पडलं चं रूपांतर पूल पडला मध्ये झालं...

आणि आता पुण्यात होर्डिंगचा सापळा पडला तो ही निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळेच...

भविष्यात अजून किती कारणांचा यात समावेश होईल हे नाही सांगता येणार

मरण अटळ आहे, यात दुमत नाही, पण असं कुणाच्यातरी बेजबाबदारपणामुळं किंवा निष्काळजीपणामुळं?

मृत्यू कुठूनही येतो. समोरून येतो, पाठीमागून येतो. जमिनीखालून येतो, आकाशातून येतो… जगण्यापेक्षा मरणाच्या वाटाच अधिक झाल्यासारखं वाटतं…

एखादी हसती-खेळती व्यक्ती ‘चल भेटू पुन्हा...’ सांगून घराबाहेर पडते, पण त्या व्यक्तीऐवजी तिची वाईट बातमीच घरी येते याचं दुःख हे ज्याचं जातं त्यालाच कळतं...