मुंबई : 2020 वर्ष सगळ्यांसाठी प्रचंड कठीण आणि मोठ्या प्रमाणात यातनादायक होतं. अर्थात छोटया मोठ्या चांगल्या गोष्टी, घटना सर्वांच्याच आयुष्यात घडल्या असतील, तशा त्या माझ्याही आयुष्यात घडल्या. पण एक अशी भेट झाली की ती या आयुष्यात विसरता येणार नाही. कोरोनाचं संकट आपल्यावर आदळण्याच्या अगदी काही दिवस आधी ‘ती’ आयुष्यात क्वचित मिळणारी अविस्मरणीय संधी चालून आली.  


‘आपले भारतरत्न’ ही माझावर 2020 याच वर्षी केलेली सिरीज, म्हणजे मला आजवरच्या नोकरीत करायला मिळालेल्या सर्वात चांगल्या कामांपैकी एक. आपल्या महाराष्ट्रातल्या ९ भारतरत्नांची माहिती महाराष्ट्राला देता येणं यापेक्षा मोठं भाग्य नाही. संगीतकार अजय अतुल पैकी एक असलेल्या अतुल गोगावलेनी या कार्यक्रमाचं निवेदन करणं हा त्यातला एक खूप चांगला पैलू.


विनोबा भावे, महर्षी कर्वे, पां वा काणे, डॉ आंबेडकर, आपलव्या लाडक्या लतादिदी, असे एपिसोड करत करत उद्योग महर्षी जेआरडी टाटांच्या एपिसोडपर्यंत आमचं काम पोहोचलं.. जानेवारी २०२० मध्ये भारतरत्नचं काम सुरु झाल्यापासूनच जेआरडी टाटांबद्दल रतन टाटांची मुलाखत मिळावी अशी इच्छा होती, त्यासाठी त्यांच्या ऑफिसचा मेल आय़डी मिळवणं, त्यांना रितसर मेल पाठवणं अस प्रयत्न सुरु होते, पण कुठूनही रिस्पॉन्स असा येत नव्हता. आता देशातल्या इतक्या मोठ्या माणसापर्यंत पोचायचं कसं हा प्रश्न होता. मालिकेतले बाकीचे भाग पूर्ण होत जेआरडी टाटांवर काम सुरु झालं, तेव्हा कुठल्याच बाबतीत आपली डॉक्युमेंटरी कमी पडायला नको, म्हणून जेआरडी टाटांच्या पहिल्या विमान प्रवासाचे व्हिडियो चक्क फिल्म आर्काईव्हजमधुन विकत आणून डॉक्युमेंटरीत वापरले. पण टेलिकास्टला दोन दिवस उरले तरीही काही रतन टाटांपर्यंत पोचता आलं नव्हतं..मग अचानक एक दिवस अतुलच्या नात्यातील एका व्यक्तीने रमेशजी नावाच्या रतन टाटांचे स्नेही असलेल्यांचा नंबर दिला. त्यांना सगळा विषय समजावून सांगितल्यावर १४ तारखेला रात्री रतन टाटांकडून होकार आल्याचं रमेशजींनी कळवलं. ज्या दिवशी भारतरत्नच्या टाटांच्या एपिसोडचं टेलिकास्ट त्याच दिवशी म्हणजे १५ मार्च २०२० लाच मुलाखत अशी ती घाई गडबड.


कुलाब्यातल्या शेवटच्या टोकाला रतन टाटांचं घर, तिथे मुलाखत होईल असंही रमेशजींनी कळवलं. कॅमेरा युनीट, कॅमेरामन वगैरे घेऊन मी ठरलेल्या वेळेच्या बरंच आधी मुलाखतीसाठी निघाले खरी, पण एवढा मोठा माणूस आपल्याला मुलाखत देणार यावर मनातून विश्वासच बसत नव्हता. रतन टाटांचं घर कुलाब्याच्या पार टोकाला अगदी समुद्राजवळ आहे. ते शोधत अगदी बाहेरच्या सिक्युरिटी बॉक्सलाच विचारपूस केली तर एबीपी माझाची टीम येणार हे त्यांना आधीपासूनच ठाऊक होतं, याचं सुखद आश्चर्य वाटलं. 


एरव्ही एखाद्या मोठ्या ठिकाणी जायचं म्हणजे आधी बाहेरचे सिक्युरिटी गार्ड हुज्जत घालणार, मग आत दोन तीन वेळा फोन करुन विचारणार, ताटकळत तरी ठेवणार असा अनुभव सगळ्या पत्रकारांना येतो. पण इथे मात्र सगळ्यांना आमच्या येण्याची आधीपासूनच कल्पना होती आणि अत्यंत अगत्याने सगळे कर्मचारी बोलत होते. (अर्थात ते टाटांच्या घरचे कर्मचारी आहेत, त्यांनी वेगळं असणं अपेक्षितच आहे.)  घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर वेटींग एरियात थांबलो आम्ही तर कुणीतरी म्हणाले एकदा दारावरची बेल वाजवा, रतन टाटा रेडी असतील तर लवकर मुलाखत करता येईल. कुणीतरी नोकर चाकर, कर्मचारीच दार उघडणार हे मनात निश्चित असल्यानं मी पटकन दारावरची बेल दाबली, लगेच दार उघडलं गेलं, तर दार उघडणारे थेट रतन टाटाच! त्यांना प्रत्यक्षात बघतेय यावरच दोन मिनिटं विश्वास बसला नाही.


मी मुलाखत घ्यायला आलीय असं एका दमात सांगून टाकलं. त्यावर रतन टाटा म्हणाले..but you are little early, can you wait for sometime, हो हो म्हणत मी आपली अबाऊट टर्न घेऊन वेटींग एरियात येऊन बसले. साधारण १५ मिनिटांनी आम्हाला आत बोलावलं आणि तुमचा सेट अप करा असं सांगितलं. कॅमेरामन सेट अप लावत होते, तेव्हा टाटांचं घर आतून पाहताना माझा मात्र जीव दडपल्यासारखा होत होता. लॅव्हीशनेस आणि साधेपणाचा संगम वाटला मला त्या घरातलं इंटेरियर म्हणजे. एकाच वेळी भव्य दिव्य पण त्याचवेळी एक साधेपणाही.




"मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा" : रतन टाटा


देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीचं घर न्याहाळत असताना  अचानक त्यांच्या घरातला मदतनीस म्हणाला लिफ्ट वाजली, म्हणजे साहेब आता येतायत खालती (सगळे मदतनीस मराठीच होते आणि मराठीतच बोलत होते.) रतन टाटा खरंच घरातल्या त्या लिफ्टनी खाली आले आणि सेट अप पाहून विचारु लागले त्यांनी कुठे बसायचंय. जेआरडी टाटांचा विषय सोडला तर इतर कुठलाच विषय नको असंही त्यांनी सांगितलं पण ते ही सांगतांना बोलण्याचा टोन अगदी साधा आणि अदबीचा होता. मुलाखत सुरु झाली, दहा मिनिटंच घ्या असंही त्यांनी मध्येच सांगितलं आणि मी मराठीत प्रस्तावना करु लागल्यावर थांबवलंच त्यांनी मला. पुन्हा विचारलं की मी इंग्रजीत बोललं तर चालेल ना, (My heart sank when you started in Marathi, I am sorry but I cannot speak Marathi, is it ok if I answer in English) हे त्यांचे शब्द. नंतर मुलाखतीत कितीतरी आठवणी सांगितल्या रतन टाटांनी जेआरडींच्याबद्दल. एवढे मोठे उद्योजक पण पिक्चर बघायची लहर आल्यावर कसे तिकीटाच्या रांगेत उभं राहून तिकीट काढायचे, किंवा घरापासून टाटा हाऊसचं ऑफिस असा प्रवास करत असताना रस्त्यात दिसणाऱ्या व्यक्तींना लिफ्ट देत पुढे जाणारे जेआरडी आपली ओळख सांगणं मात्र कटाक्षाने टाळायचे. जेआरडी टाटांना भारतरत्न घोषित झालं तो क्षण अशी मस्त रंगली मुलाखत..आमची मुलाखत झाल्यावर दोन्ही कॅमेरामननी सामान आवरायला घेतलं तर रतन टाटा आमच्याबरोबर उभेच. शेवटी पार संकोचून गेल्यानं मीच म्हंटलं की Sir, please carry on we will leave now. पण रतन टाटा मात्र आम्हाला see off करण्यासाठी थांबले आणि आम्हाला बाय करुन मगच आता गेले. देशातल्या सगळ्यात मोठ्या उदयोजकाशी झालेली ही भेट मी कायम अभिमानाने मिरवणार एवढं नक्की.


भारती सहस्त्रबुद्धे