Ayodhya Ram Temple and Elections : शरयू किनारी, अयोध्येमध्ये (Ayodhya) जानेवारी 2024 मध्ये भव्यदिव्य मंदिरात (Ram Mandir) श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. राज्यभिषेकाप्रमाणेचं जणू हा सोहळ्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. पण यात मुख्य गोष्ट म्हणजे प्राणप्रतिष्ठेआधी 100 क्विंटल अक्षता पूजन होणार आहे आणि या अक्षता भगवान रामाचा (Lord Rama) प्रसाद म्हणून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरामध्ये जवळपास 62 कोटी लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि हाच जनसंपर्क लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) यज्ञामधली समिधा ठरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्याचे आयाम असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा राष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीनं संपर्काचा कार्यक्रम हाती घेण्यात आला, तेव्हा तेव्हा त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा वातावरणनिर्मितीला झाला आहे. संघानं आजवर अशी अनेक अभियानं राबवली आहेत. अशीच काही अभियानं आपण पाहुया. 1966 साली नेहरुंच्या काळात तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या नेतृत्वात गौरक्षा स्वाक्षरी अभियान राबवलं गेलं होतं. सर्व समाजानं त्यात सहभागी होऊन कित्येक कोटी सह्या गोळा केल्या होत्या. त्यानंतर 2013 साली सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या सार्धशतीचं निमित्त साधून संघाकडून स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी संबंधित इस्कॉन, विवेकानंद केंद्र, विविध संप्रदाय या सगळ्यांना देशपातळीवर एकत्र करुन एक समान कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला गेला होता. यासाठी संघाकडून एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर योगायोग म्हणजे त्यानंतर 2014 साली देशभरात लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतरचा परिणाम समोर आहेच.


त्याचप्रमाणे गेल्या अनेक दशकांचा श्रीराम जन्मभूमीचा लढा जो अशक्यप्राय होता, तो निकरानं लढला गेला. याबाबतच मंदिराचं भूमिपूजन पार पडत असताना संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं की, 1986-87 सालात संघाच्या बैठकीत चर्चा झाली आणि संघानं प्रत्यक्षपणे श्रीराम मंदिरासाठी लढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी यासाठी 30 ते 35 वर्ष सलग काम केल्यानंतर तर यश मिळेल, असं भाकीत वर्तवलं होतं. पण अर्थात संघानं त्यावेळी यासाठी जे-जे कार्यक्रम राबवले ते म्हणजे मंदिराच्या विटा गावागावत नेणे, त्यांची मिरवणूक काढणे, यात गावपातळीवर आस्थेने, श्रद्धेने लोकांना यामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्याभूमीसाठी चळवळ उभी केली गेली, संस्थांना जोडलं गेलं मुख्य म्हणजे सर्वांना त्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलं. त्यानंतर कोर्टाचा लढा ते आता पार पडणारी प्राणप्रतिष्ठा हे सर्वांना माहिती आहेच.


आत्ताही श्रीराम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर देगणीसाठी केलेलं आवाहन पाहा, यासाठी त्यांनी समाजातील प्रमुख व्यक्तींनाच नव्हे बांधलं जाणारं मंदिर प्रत्येकाचं आहे, त्यात सारे सहभागी होऊया अशी भाविनक साद घातली, ज्याला देशभरातून सर्व समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्यानंतर अक्षदा पूजनाचा कार्यक्रम... आता कार्यक्रम राबवताना तो गावांसह शहराशहरात राबवला जाणार आहे, त्यासाठी कार्यक्रम आखून झाला आहे, यासाठी थेट प्रक्षेपण करणं असेल, बॅनर्स लावणं असेल अशा लहान लहान योजना राबवून त्यात लोकसहभाग कसा राहिल याकडे संघाने आजवर निक्षून लक्ष दिलं आहे. 


संघाच्या याच संपर्क अभियानाच्या मॉडेलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण संघ कधीही कोणाला मतदान करा अथवा करु नका सांगत नाही, की कोणत्याही पक्षाला मदत करत नाही किंवा कोणात्या पक्षाला मदत करु नका सांगत नाही, संघानं हाती घेतलेल्या कार्यक्रमांनी आजवर वातावरण निर्मिती केली आहे. आत्ताही या अक्षतांच्या कार्यक्रमामुळं संघ कैककोटी घरांमध्ये पोहोचेल, त्यांची विचारधारा अप्रत्यक्षपणे तिथे पोहोचेल, योगायोग म्हणजे संघाच्या या अभियानाचं एक वर्तुळ 2024 सालीच पूर्ण होत आहे आणि पुढच्याच वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुज्ञान अधिक न सांगणे!


डिस्क्लेमर : ब्लॉगमधील मते वैयक्तिक आहेत