फेमस अभिनेता आणि दिग्दर्शकाची जोडी म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर टीम बर्टन - जॉनी डेप , स्कॉर्सेसी -लियो , नोलान - मायकेल केन अशी नावं पटकन येतात. हे लोक भारीच आहेत पण माझ्यासाठी या यादीत गोविंदा आणि डेव्हिड धवन हे नाव पण येतंच . (सनी देओल  -राजकुमार संतोषी पण आहेतच यादीत) इतकं हमखास यश मिळणारी जोडी निव्वळ इगोजमुळे तुटली हे आपलं दुर्दैव. नव्वदच्या दशकात सिनेमा बघत मोठा झालेल्या प्रत्येकाच्या भावविश्वात गोविंदा आणि डेव्हिड धवनचं महत्वाचं स्थान आहे. बहुसंख्याना आवडणाऱ्या कलाकारांची किंवा त्यांच्या कलाकृतीची आपल्याकडे ज्या प्रमाणात समीक्षा व्हायला हवी, त्या प्रमाणात होताना दिसत नाही. सिनेमा क्षेत्राला पण हे लागू पडतं. बहुतेक समीक्षक बहुसंख्य प्रेक्षकांना आवडणाऱ्या कलाकृतीला उथळ किंवा वाह्यात असं लेबल लावून त्या कलाकृतीचीकलाकाराची वासलात लावून टाकतात. सिनेमा हा वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय असला तरी बहुसंख्यांना ही कलाकृती का आवडली, याचं तटस्थ सखोल विश्लेषण व्हायला हवं. डेव्हिड धवन आणि गोविंदाचा सिनेमा हा अशाच दुर्लक्षाचा बळी ठरला. फराह खानसारख्या व्यावसायिक सिनेमा देणाऱ्या दिग्दर्शिकेपासून ते कायम वेगळी वाट चोखाळणाऱ्या अनुराग कश्यपपर्यंत सगळ्यांचाच डेव्हिड हा आवडता दिग्दर्शक आहे. फराह खानने तर डेव्हिडला 'निजाम ऑफ नॉन्सेन्स' (ढोबळमानाने ‘वात्रटपणाचा सम्राट’) असा ‘किताब’ दिला आहे. तर अनुराग कायम त्याच्या मुलाखतीमध्ये सांगत असतो की, ‘मला छोट्या बजेटच्या फिल्म्सचा डेव्हिड धवन बनायचं आहे.’ काहीतरी आहे डेव्हिडमध्ये हे नक्की.


डेव्हिडचा विषय निघतो तेव्हा गोविंदाचा विषय आपसूक निघतोच. दोघांनीही ‘हिरो नंबर वन’, ‘कुली नंबर वन’, ‘साजन चले ससुराल’ असे तब्बल एकवीस चित्रपट एकत्र केले. त्यातले बहुतेक चित्रपट सुपरहिट आहेत. गोविंदा हा नवाज, इरफान, मनोज वाजपेयी यांच्या तोडीचा अभिनेता आहे, असं मी जेव्हा जेव्हा बोलतो, तेव्हा लोक माझ्याकडे भूत बघितल्यासारखं बघतात. त्यांचंही काही चूक नाही. गोविंदाला आपण कुठल्या प्रतीचे अभिनेते आहोत हे कळलं असेल का याबद्दल शंका आहे. गोविंदा आयुष्यात कधी कलात्मक सिनेमाच्या वाट्याला गेला नाही. त्याचे जवळपास सगळेच चित्रपट मासेस श्रेणीत मोडणारे असल्यामुळे त्याच्याकडे समीक्षकांनी कधी गंभीरपणे बघितलं नाही. अभिजन वर्ग त्याच्या भडक कपड्यांमुळे, काही डबल मिनिंग गाण्यांमुळे त्याच्याकडे बघून नाक मुरडतो. यात अभिनेता गोविंदा नेहमीच दुर्लक्षिला गेला.

एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या डेव्हिडला भारतीय सिनेमे बघणाऱ्या अनेक प्रेक्षकांप्रमाणेच आपण हिंदी सिनेमाचा हिरो व्हावं असं वाटायचं. त्याला पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाच्या कोर्सला प्रवेशही मिळाला होता. पण नंतर त्याने तो निर्णय बदलला. अभिनयाच्या कोर्सला प्रवेश घेतलेल्या इतर मुलांचा अभिनय पाहून आपण किती खोल पाण्यात आहोत याचा अंदाज त्याला आला आणि त्याने एडिटिंगच्या कोर्सला प्रवेश घेतला. राज कपूरसारख्या दिग्दर्शकाचं असं मत होतं की, सिनेमा हा एडिटिंगच्या टेबलवर बनतो. एडिटिंगचं काम हे क्लिष्ट आणि वेळखाऊ असतं. तुम्ही चित्रित केलेलं फुटेज कितीही चांगलं असलं तरीही जर एडिटरने आपलं काम व्यवस्थित केलं नाही तर सिनेमाची वाट लागू शकते. त्यामुळे एका चांगल्या एडिटरला सिनेमाची चांगली जाणीव असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे अनेक एडिटर पुढे जाऊन दिग्दर्शक बनतात.

याचं अजून एक उदाहरण म्हणजे सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक राजू हिराणी. डेव्हिडलाही दिग्दर्शनाचा किडा चावलाच. त्याने दिग्दर्शित केलेले पहिले तीन सिनेमे काही फारसा चमत्कार दाखवू शकले नाहीत. पण राजेश खन्ना आणि गोविंदाला घेऊन बनवलेला 'स्वर्ग' सुपरहिट झाला आणि नंतर डेव्हिडला मागे वळून बघण्याची गरज पडली नाही. सुरुवातीच्या काळातले डेव्हिडचे सिनेमे बटबटीत भावनांचे प्रदर्शन करणारे नाही, तर मारधाड करणारे असत. 'आँखे'पासून डेव्हिडने आपल्या कारकिर्दीचा गियर बदलला. 'आँखे'मध्ये विनोदी प्रसंगात गोविंदा, चंकी पांडे, कादर खान या मंडळींनी धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांनी या विनोदी प्रसंगांना बंपर प्रतिसाद दिला. आपल्याला प्रेक्षकांची नाडी कळाली आहे हा विश्वास डेव्हिडला या चित्रपटापासूनच मिळाला. 'आँखे' नंतर सतत दशकभर डेव्हिडने गोविंदासोबत सातत्याने हिट सिनेमे दिले. पुढच्या काळात या दोघांनी 'शोला और शबनम', 'आँखे', 'राजाबाबू', 'कुली नंबर वन', 'हिरो नंबर वन', 'पार्टनर', 'साजन चले ससुराल' असे तब्बल वीसच्या आसपास चित्रपट केले. त्यातले तुरळक अपवाद वगळता बहुतेक चित्रपट तिकीट खिडकीवर तुफान चालले. हा एकांड्या निर्मात्यांचा काळ होता. बॉलिवूडमध्ये आर्थिक आघाडीवर आणि इतरही अनेक आघाड्यांवर अनागोंदी होती. व्यावसायिकता पण फारशी रुजलेली नव्हती. मुख्य नट स्वतःला पाहिजे त्यावेळेला सेटवर यायचा आणि पाहिजे तेव्हा निघून जायचा. त्याच्याभोवती चमच्यांचं कोंडाळं असायचं. त्यांच्या खाण्यापिण्याचा आणि इतर शौकांचा खर्च झक मारून निर्मात्याला करावा लागायचा. शाहरुख, आमिर आणि सलमान ही खान मंडळी अजून बस्तान बसवण्यातच गुंग होती. आज त्यांच्या प्रत्येक सिनेमावर जशा प्रेक्षकांच्या उड्या पडतात आणि त्यांच्या चित्रपटांना बंपर ओपनिंग मिळते, तशी तेव्हा परिस्थिती नव्हती. त्या काळात वितरकांची पसंद डेव्हिड आणि गोविंदाच्या पिक्चरला असायची.

धवनचे चित्रपट मासेसला किंवा पिटातल्या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेले होते. द्वयर्थी गाणी, टपोरी किंवा ग्रामीण लहेजातले संवाद, विशिष्ट प्रकारचं भारतीय वाद्यमेळ असणारं संगीत, प्रेक्षकांना सहज कळतील असे विनोद, नायकासोबत असणारी विनोदवीरांची फौज असं धवनच्या चित्रपटांचं एक ठरलेलं 'मॉडेल' होतं. प्रेक्षकांनी त्याला तुफान प्रतिसाद दिला. दादा कोंडकेंनी मराठीमध्ये जे एक 'मॉडेल' तयार केलं होतं, त्याचा प्रभाव धवनवर होता. त्याने हेच मॉडेल हिंदीमध्ये यशस्वीपणे राबवलं. पडद्यावर दादा कोंडकेंची पोकळी भरून काढण्यासाठी गोविंदापेक्षा दुसरा आदर्श नट असूच शकत नव्हता. दादा कोंडके आणि गोविंदा यांच्यात अभिनेता आश्चर्यकारक म्हणावीत इतकी साम्यस्थळं आहेत. गोविंदाला त्याचा खूप व्यावसायिक फायदाही झाला.

पण हे यश हीच गोविंदाची आणि डेव्हिड धवनची मर्यादा ठरत गेली. मराठीमध्ये दादा कोंडकेंचं जे झालं, तेच या दोघांचं  झालं. एक विशिष्ट अभिरूची असणारा ओपिनियन मेकर वर्ग त्यांच्याकडे पाहून नाक मुरडू लागला. या दोघांचा चाहता वर्ग देशभरात मोठ्या प्रमाणावर असला तरी तो वर्ग ओपिनियन मेकर नव्हता. तो बहुतेक श्रमिक आणि मध्यमवर्गातला होता. शेवटी तुमचा चाहता वर्ग कुठल्या वर्गातला आहे, यावरून तुमची 'लिगसी' काय असणार, हे ठरतं, हे दुर्दैवी वास्तव आहे. त्यातूनच 'क्लासिकल' कलाकार आणि 'मासेस'चे कलाकार असे ठप्पे मारून कलाकाराला विशिष्ट वर्गात बंदीस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. यातून ‘पिटातल्या प्रेक्षकांसाठी सिनेमा बनवणारे’ अशी या दोघांची इमेज बनली किंवा जाणीवपूर्वक बनवली गेली. गोविंदाला  एकाच छापाच्या भूमिका मिळत गेल्या. प्रेक्षकांनाही फक्त विनोदवीर गोविंदा हवा होता बहुतेक. 'शिकारी'सारख्या चित्रपटात त्याने वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला नाकारलं. त्याच्यासारख्या नटाला ऐनभरात असतानाही कुठल्याही मोठ्या निर्मात्याने (यशराज, धर्मा इ .) काम दिलं नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे.

डेव्हिड धवनचा मुलगा वरुण धवन पण अभिनेता बनला. दरम्यानच्या काळात गोविंदा आणि डेव्हिड धवन व्यवसायिकदृष्ट्या आणि वैयक्तिकदृष्ट्या एकमेकांपासून दुरावले होते. पण लहानपणापासून गोविंदाच्या अंगावर खेळलेल्या वरुणसाठी गोविंदा 'अंकल' हा जगातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला परवा एका मुलाखतीमध्ये विचारलं की ,'तुला कुणासारखा अभिनय करायला आवडेल?" वरुण धवनने लगेच उत्तर दिलं, 'गोविंदा, कारण तो एक परिपूर्ण अभिनेता आहे.' काही गोष्टी कालातीत असतात हेच खरं.

अमोल उदगीरकर