माननीय, श्री. राज ठाकरे साहेब,

शिवतीर्थावरील तुमचे भाषण ऐकले. खूप छान झालं. त्या सभेत तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही जे मुद्दे मांडता, ते खूप महत्वाचे असतात आणि ते मुद्दे जर खरंच अंमलात आले, तर खरंच आपल्या महाराष्ट्रात खूप चांगला बदल घडू शकतो.

पण साहेब, त्या भाषणात तुम्ही अभिनेता अक्षय कुमारबद्दल म्हणालात की, तो भारतीय नागरिक नसून कॅनेडियन आहे. खरंच या भाषणात हा उल्लेख करणं योग्य होत का? असो.

अक्षय कुमार हा नागरिकत्वाने कॅनेडियन आहे. अक्षय कुमारचा अभिनय, तसेच भारत आणि कॅनडामधील सामाजिक काम बघून त्याला कॅनडा सरकारने २००८ साली 'ऑनररी डॉक्टरेट' या मानद पदवीने गौरवलं. बहाल केली. (Honorary Doctorate Of Law by the university of windsor in Ontario, Canada for his outstanding work in the film industry and contribution to social work. )

मुळात कोणत्या देशाचे नागरिकत्व घ्यायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याही पलिकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल, अक्षय कुमार त्याने आपल्या भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी बहुमोल मदत केली आहे. आणि त्याने जे काही काम केले आहे, ते एवढे उत्तुंग आहे की त्याची पाठ थोपटायला हवी. पण साहेब, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा साधा उल्लेख सुद्धा नाही केलात.

साहेब, अक्षय कुमार भारतीय नसून कॅनेडियन आहे, ही माहिती कशी तुम्हाला मिळाली, तशीच तुम्हाला त्याने केलेल्या कामांची माहिती सुद्धा मिळाली असेल. मग त्या कामांचा पुसटसा उल्लेख सुद्धा तुम्ही केला नाहीत. हे माझ्यासारख्या लाखो फॅन्ससाठी निराशाजनक आहे.

१. महाराष्ट्रातील दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या १८० कुटुंबियांना ९० लाख रुपये मदत म्हणून दिले.

२. सलमान खानच्या बिईंग ह्यूमन या सामाजिक संस्थेला ५० लाखाची मदत दिली.

३. चेन्नईतील पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत दिली.

४. अक्षय कुमार कित्येक वर्षांपासून मुंबईत महिलांसाठी सेल्फ डिफेंन्स ट्रेनिंग मोफत देतोय. आणि आतापर्यंत तब्बल ५ हजाराहून अधिक महिला तेथे ट्रेन झाल्या आहेत.

५. ऑगस्ट २०१६ मध्ये शाहिद जवानांच्या (BSF) कुटुंबियांना ८० लाखाची मदत केली.

६. मार्च २०१७ मध्ये शाहिद झालेल्या जवानांच्या (CRPF) कुटुंबियांना १ कोटी ८ लाखांची मदत दिली. (१२ कुटुंबांना प्रत्येकी ९ लाख रुपये)

७. नोव्हेंबर २०१६ मध्ये जेव्हा अक्षय कुमारने विदर्भातील यवतमाळ या गावाची कहाणी ऐकली की, दुष्काळाला शेतकरी कंटाळून तेथील शेतकरी आत्महत्या करत आहेत. तेव्हा अक्षयने त्वरित महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन ते गाव दत्तक घेतले.

८. आपल्या शाहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत व्हावी म्हणून bharatkeveer.gov.in या नावाने वेब पोर्टल सुरू केलं आणि जेणेकरून प्रत्येक कुटुंबला १५ लाख रुपये मदत मिळेल.

९. एप्रिल २०१७ मध्ये सिनेमात जे डब रोल करतात आणि जे जीवाची बाजी लावून अॅक्शन स्टंट करतात, त्यांच्यासाठी प्रत्येकी ६ लाखाचा मेडिकल इन्शुरन्स सुरू केला.

१०. २०१७, गेल्या दिवाळीत एकूण १०३ शाहिद जवानांच्या घरी अक्षय कुमारने दिवाळी फराळ, आणि २५ हजारचा चेक भेट म्हणून दिली होती.

राज साहेब, हे सर्व काही तुम्ही ज्याला कॅनेडियन नागरिक म्हणता, त्या अक्षय कुमारने केले आहे. कारण अक्षयने सामाजिक काम करताना देश किंवा नागरिकत्व पहिले नाही, माणूस पहिला. कारण सारी मदत त्याने माणुसकीच्या नात्याने केली. मग आपणही त्याच्याकडे माणूस म्हणून न पाहता कॅनेडियन म्हणून का पाहता?

अजून बऱ्याच गोष्टी आहेत. खूप बोलता येईल. पण आता नको. साहेब, काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला भेट दिली होती. माझा कट्टा या कार्यक्रमात त्याने दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी त्याने महाराष्ट्रासाठी संपूर्ण त्याचे विचार आणि दृष्टिकोन व्यक्त केले होते. ते तुम्ही एकदा बघितलात तर नक्कीच तुम्हाला कळेल. (माझा कट्टाची लिंक : )

साहेब शेवटी एकच सांगतो, मदर तेरेसा असो भगिनी निवेदिता असो, आपल्या देशाने कधीच कुणाला परके मानले नाही. करण आपल्या देशात व्यक्ती नव्हे, व्यक्तीचे कार्य बघितले जाते, माणुसकी पहिली जाते, प्रामाणिकपणा पहिला जातो...मग अक्षय कुमारकडेही आपण माणुसकी, प्रामाणिकपणा आणि दानशूर व्यक्ती म्हणून का पाहत नाही? आणि तसेही, कॅनेडियन नागरिकत्व असले म्हणून त्याने केलेल्या भारतातील सामाजिक कामांचे महत्व कमी होत नाही.

प्रथमेश मोरे

#WeSupportAkshayKumar