रक्त गोठवणाऱ्या थंडीतला तो दिवस आठवतो... एक आख्ख कुटुंब कारसह महाबळेश्वरला येणाऱ्या घाटातील दरीत कोसळलं होतं. एका एसएमएसवर आमच्या महाबळेश्वर ट्रेकर्सच्या संपूर्ण टीमने पसरणी, केळघर घाट पालथा घातला होता. पाच तासांच्या शोधानंतर सायंकाळी शोधमोहिम थांबवली होती. थकलेल्या अवस्थेतील आमच्या महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना मी वाईत एकत्र केले. कोण कुठले, कोणत्या जातीचे काहीच माहीत नव्हते. वाईत पोहचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. सर्वजण आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत. पुढे शोधमोहिम राबवायची की नाही यावरुन चर्चा गरम झाली होती. त्यात सर्वांच्या अंगाला थंडी चांगलीच झोंबत होती. काहींनी स्वेटर आणले होते तर काही जणांचे स्वेटर म्हणजे तोडक्या मोडक्या पैशातून आम्ही तयार करुन घेतलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्सचे टी शर्ट घालून आलेले. चर्चेतून मी निर्णय दिला होता, शोधमोहिम पुढे सुरुच राहणार...




जर आपल्याला वाई शहरात एवढी थंडी लागू शकते तर ते दरीत अडकलेले पाच जण जिवंत असतील तर थंडीने... कोणताही अनर्थ घडू शकणार होता. दरीत किती जिवंत आहेत हे जरी माहिती नसले तरी आपण या थंडीला भिऊन घरी जाऊन झोपणे शक्य नव्हते.

शोधमोहिम सुरुच ठेवायची या निर्णयामुळे काहींची तोंड वाकडी झाली. तीन गाड्या होत्या. एक गाडी कमी केली तर पॅट्रोलचे पैसे वाचतील. मग दोन गाड्यातच सगळी कोंबली आणि आम्ही भोरच्या दिशेने मार्गस्थ झालो. भोरच्या वरंदा घाटात शोधमोहिम राबवून आम्ही महाडच्या दिशेने पोलादपूरकडे सरकलो.



पोलादपूर ते प्रतापगड यांच्या दरम्यानच्या  अंबेनळीच्या घाटात डोळ्यात तेल घालून महाबळेश्वर ट्रेकर्सचा कार्यकर्ते शोध मोहिमेत सक्रिय होता. अंधारात शोधमोहिम राबवताना सुनिल बाबा भाटियांच्या स्वखर्चातून आणलेल्या दर्जेदार बॅटऱ्यांचा मोठा आधार होता. अर्धा घाट वरती आलो... रात्रीचे बारा वाजून गेले होते. दरीतून वेगवेगळे आवाज बाहेर पडत होते.. त्यात तो रातकिड्यांचा किर्रर्रर्र आवाज. त्या आवाजातला एक वेगळा आवाज. याच आवाजातून  कोणाचातरी ओरडलेला नाजूकसा आवाज बाहेर आला.. कान टवकारले. अपघाताच ठिकाण सापडले या आशेनं आमच्या डोळ्यातल पाणी तरारलं. सर्वजण त्याच ठिकाणी थांबले... प्रत्येक कार्यकर्त्याने आपापली भूमिका बजावायला सुरुवात केली. सुनिल बाबांनी वरुनच आशेचा आवाज दिला.... “आम्ही आलो आहोत तुम्ही भिऊ नका”....  मी आणि माझा सहकारी सनी बावळेकरने हार्णेस चढवले. डोक्याला बॅटरी लावली. कसलाही विचार न करता खोल दरीच्या दिशेने झेपावलो.... दरीचा अंदाज नसताना धडा धड कठडे पार करत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. दरीच्या तिसऱ्या टप्यापर्यंत निलेश, संदिप, क्षेत्रातला बिरामणे तिघे आले होते.... बाकीच्यांनी दरीच्या वरुन सर्व भुमिका व्यवस्थित बजवायला सुरुवात केली.... आमच्या चेहऱ्यावर अफलातून आनंद होता. त्या बेपत्ता लोकांचं ठिकाण मिळून आले होते.... रस्ता तयार करत होतो. झाडझुडुप तोडत रस्ता करत खाली उतरत होतो... आठशे फुटांवर एक बारा-तेरा वर्षाची मुलगी दिसली... रडत कण्हत होती... शेजारीच एकजण होता.... आम्ही धीर दिला ... प्रथम मुलगी वरती घेऊन जाण्याचा निर्णय घेतला... पण शेजारीच असलेला अपघातातील एक जण हिंदीत बोलला ... “मेरेको पहले उपर ले चलो प्लीज” ... लहान मुलीचा विचार न करता मला घेऊन चला अस म्हणाल्या मुळे मला माकडाच्या पिल्लाची गोष्ट आठवली... नही हमलोग पहले इस लडकी को उपर पोहचाकर फिर वापिस आयेंगे अस म्हणत त्या मुलीला घेऊन मी तिथून निघालो... ते सगळे कन्नड भाषिक असल्यामुळे ती मुलगी त्या भाषेत काय बोलते हे मला समजत नव्हते आणि तिला हिंदीही बोलता येत नव्हते...त्यामुळे ती काहीतरी मला सांगत होती ते मला समजलेच नाही..रक्ताने माखलेली, मळलेली, कपडे फाटलेली, एका हाताने कवटाळून तिला जवळ घेतले. ...जवळपास खालून वरती येईपर्यंत आमचा दीड तास गेला होता...त्या जखमी चिमुकलीला कोणती वेदना होऊ नये म्हणून मी हातातून तिला वरती येई पर्यंत कोठेच खाली ठेवले नाही.. एक एक करत जिवंत असलेल्या चौघांना पहाटे सहापर्यंत बाहेर काढण्यात यश मिळवले होते... आता चार जणांना वर काढताना चार वेळा आठशे फुट दरीतून खालीवर झाले होते.. त्या सर्वांची चड्डीतच शी-शु केली होती. त्यामुळे मी पूर्णच वासाने घुमत होतो...कसलाही विचार न करता ही सर्व पराकाष्ठा सुरु होती.... शरीराला अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या... काम करताना खपारीतून सुटलेले अनेक दगड डोक्यापासून घासून जात होते... एका ठिकाणी तर चेंडूपेक्षा थोडा मोठा दगड दरीच्या दिशेने गडगडत जाताना मैदानात चेंडु पकडावा असा, तसा डाय मारुन तो दगड मी पकडला. तो दरीत जाऊन खाली गेला असता तर त्या जखमींना शंभरटक्के लागला असता.

जिवंत लोकांना बाहेर काढल्यानंतर मृतदेह काढले... जखमींना पोलादपूरच्या शासकीय रुग्णालयात पोहचवणारी यंत्रणा चोख काम करत होती...सकाळी आकरा पर्यंत मृतदेह बाहेर काढले... सर्व काही सुपस्पार पडले होते... एवढं थकूनही रात्रभर कोणीच झोपले नव्हते... सर्व जण थकले होते. माझा तर जीव भेंडाळला होता. चार वेळा दरीतुन वर खाली झाले होते.



चौघांना जिवंत बाहेर काढल्यानंतर  माझ्यातला पत्रकार जागा झाला होता... त्या लोकांचे जीव माझ्या बातमीदारीपेक्षा मोठे होते...जिवंत लोकांना बाहेर काढल्यावर सकाळी सात वाजता आमच्या ऑफिसला घटनेची माहिती दिली. क्षणात ती बातमी हेडलाईन झाली होती... बातमी खुप मोठी होती....एबीपी माझावर Exclusive म्हणूनच सुरु झाली.|ऑफिसला सांगताना मात्र मी रात्री काय केल हे सांगितले नाही. ट्रेकर्सने काय केले हेच सांगितले.

दुपारी चार वाजता आम्ही सर्वजण महाबळेश्वरात पोहचलो होतो... अंगाचा खुप घाण वास येत होता... अंघोळ करायची आणि झोपायच अस मनात ठरवलं होत..तेवढ्यात आमच्या सुनिल बाबा भाटियांना पोलिस ठाण्यातून फोन आला... त्या कुटुंबाचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आले होते. त्या नातेवाईकांच म्हणणे होते, त्या गाडीतल्या दरीत पैसे आणि सोने आहे काढून देता का....बाबांनी मला विचारले राहुल भाऊ काय करायचे.... माझ डोक चांगलच तापल होतं कारण नातेवाईकांनी कुठ आभार मानायला फोन केला नव्हता तर त्यांना पडले होते साहित्याचे.. ते दु:खात असतील, भांबवले असतील म्हणून त्यांच्याकडून आभार मानायचे राहुन गेले असेल अस म्हणत मी स्वता:चीच समजूत काढली आणि पुन्हा कोणीच दरीत उतरायला जायचे नाही असे सांगितेल. पोलिसांनाही तसाच निरोप दिला.

माझे बॉस म्हणजेच एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना समजले की आपला राहुल तपासे हा सुद्धा या शोध मोहिमेत सक्रीय होता आणि तो दरीत उतरला होता...  हे त्यांना समजेपर्यंत त्यांनी काही सेकंदातच मला फोन करुन माझे आणि माझ्या सहकारी ट्रेकर्सचे अभिनंदन केले. तसं एबीपी माझावरच्या बातमीत सर्वच ट्रेकर्सचे कौतुक सुरुच होते. सरांचा अभिनंदनासाठी फोन आल्यावर मी खुपच भारावून गेलो...पण जिथं मुरलं तिथं मात्र दुष्काळ होता... ज्यांना बाहेर काढले त्यांच्याकडून कोणत्याच प्रतिक्रिया नव्हत्या.



जखमी बरे होतील ते दु:खातून बाहेर येतील आणि आपल्या संस्थेतील लोकांना आभाराचा एक फोन करतील अशी आशा बाळगत आम्ही सगळेच त्यांच्या फोनची वाट पहात होतो, कशाचं काय ??? ... 36 तास ते त्या दरीत तडफडत होते... त्यांच्या आयुष्याचा शेवट जवळ आला होता...कोणतही ठिकाण माहिती नसताना, पोलिसांचं कोणतही सहकार्य नसताना अथक प्रयत्नातून महाबळेश्वर ट्रेकर्सनी त्या गाडीचा शोध घेऊन त्या अपघातग्रस्थांना आम्ही सर्वांनी जीवदान दिल होत. त्यांना बाहेर काढण्यासाठी जीवाचं रान केल होत, याचं कोणतंच भान त्यांना गेल्या 365 दिवसात झाले नाही. सामाजिक संस्था काम करताना उपकाराची फेड कोणीतरी करावी अशी अपेक्षा नसते आणि नाही, पण जसं एका कलाकाराला टाळ्यांची साथ हवी असते, तशी आमच्या सारख्या ट्रेकर्सनाही सामाजिक कार्यकर्त्याना एका आभाराच्या फोनची अपेक्षा होती. अभिनंदनाचा वर्षाव राज्यभरातून आला पण जिथं खऱ्या अर्थाने सगळेच अपेक्षेने वाट पहात होतो त्यांनी मात्र आजपर्यंत एकही फोन नाही संदेश नाही. का दु:ख वाटू नये, का डोळ्यात पाणी यावं? हा माणुसकीतला कोणता पैलू म्हणावा. अंगावर काटा आणणाऱ्या मोहिमेच्या चर्चेमुळे आजच्या तारखेला एका कार्यकर्त्याचे ठरत आलेलं लग्न मोडण्यापर्यंत गेलं. मुलीच्या घरच्यांनी अट टाकली, जर आमची मुलगी तुमच्या घरात द्यायची तर धोक्याचं काम करणाऱ्या त्या तुमच्या महाबळेश्वर ट्रेकर्सच्या संस्थेला राजीनामा द्यावा लागेल. बिचाऱ्याने नाईलाजाने राजीनामा दिला. हे इतकं ट्रेकर्स सहन करत असतात. आणि हे धोक्याचं काम करताना या मंडळींची अपेक्षा असते ती फक्त त्या कुटुंबाकडून पाठीवर शाब्बासकीची थाप..... शेवटी आम्ही एवढंच म्हणू की जे वाचले त्यांच्या भावी आय़ुष्यासाठी शुभेच्छा आणि जे मृत झाले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.......