Shravan 2026 : श्रावण (Shravan 2026) महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. भगवान शंकराची उपासना, रुद्राभिषेक, जलाभिषेक, व्रत आणि विविध धार्मिक विधींमुळे या महिन्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. मात्र, दरवर्षी एक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. भारतातील काही राज्यांमध्ये श्रावण महिना एका ठराविक तारखेला सुरु होतो तर काही ठिकाणी तो एक महिन्याआधी सुरु होतो. खरंतर, यामागे कोणताच मतभेद नाही. पण, हिंदू पंचांगच्या दोन वेगवेगळ्या गणना पद्धती कारणीभूत आहेत. त्यामुळे तारखा वेगळ्या असल्या तरी श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व सर्वत्र समानच राहते.
श्रावण नावाची उत्पत्ती कशी झाली?
'श्रावण' हा शब्द संस्कृतमधील 'श्रवण' नक्षत्रावरून तयार झाला आहे. जोतिष शास्त्रानुसार, चांद्रमासाला श्रावण मास असे म्हणतात. त्यामुळे या महिन्याचे नाव थेट आकाशातील नक्षत्राशी संबंधित आहे.
हिंदू पंचांगाच्या दोन पद्धती
भारतात हिंदू पंचांगाच्या प्रामुख्याने दोन पद्धती प्रचलित आहेत, पौर्णिमा आणि अमावस्या. याच दोन पद्धतींमुळे श्रावण महिन्याच्या प्रारंभ आणि समाप्तीच्या तारखांमध्ये फरक दिसून येतो.
पौर्णिमा पंचांग
पौर्णिमा पद्धतीमुळे पौर्णिमानंतरच्या दुसर्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो आणि पुढील पौर्णिमेला संपतो. ही पद्धत मुख्यत: उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये पाळली जाते.
अमावस्या पंचांग
अमावस्या पद्धतीमध्ये अमावस्या नंतरच्या दुसर्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो आणि पुढील अमावस्येला संपतो. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये ही पद्धत प्रचलित आहे.
श्रावणाच्या तारखा वेगळ्या का असतात?
पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही पंचांगांमध्ये महिन्याची सुरूवात वेगवेगळ्या तिथिपासून होत असल्याने श्रावण महिन्याची सुरुवात आणि समाप्तीच्या तारखांमध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील कॅलेंडरमध्ये श्रावणाच्या तारखा वेगवेगळ्या दिसतात.
मात्र, हा फरक फक्त पंचांगाच्या गणनेच्या पद्धतीचा आहे. धार्मिक शद्धा, भगवान शंकरावरील भक्ती आणि श्रावण महिन्याचे महत्त्व या दोन्ही पद्धतींमध्ये अगदी समान आहे.
श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व
श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो. या काळात शिवभक्त मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक, दूध, बेलपत्र, धोत्र्याचे फूल, भस्म आणि फुले अर्पण करतात. अनेकजण श्रावणातील सोमवारचे व्रत पाळतात, रूद्राभिषेक करतात आणि 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
