Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मियांच्या महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजेच गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने सगळीकडेच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. याच निमित्ताने महाराष्ट्रातील मानाच्या गणपतीं संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची आणि प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरं आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात असलेल्या ह्या मंदिरांचा स्वतंत्र असा इतिहास आहे. 


1. मोरगांव : 


अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू आणि आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.


या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हेरावर आहे. तर बारामतीपासून 35 कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी 17 कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, त्यांचे वंशज पिरंगुट या गावी आजही राहतात.


2. थेऊर :


अष्टविनायकांपैकी थेऊरचा चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.


3. सिद्धटेक : 


सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून 19 कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून 23 कि. मी. अंतरावर आहे. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते.


4. रांजणगाव :


अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. हे महागणपतीचे स्थान इ.स. 10 व्या शतकातील आहे. गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न आणि मनमोहक अशी गणपतींची मूर्ती आहे.


5. ओझर :


अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील गणपतींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नेश्र्वराला ओळखले जाते.  डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न आणि मंगल मूर्ती असलेला गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.


6. लेण्याद्री :


अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत आणि त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून 7 कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे 97 कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.


7. महाड :


महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे आणि त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला आणि मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे आणि उजव्या सोंडेची आहे. इ.स. 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महाड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.


8. पाली :


पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी आणि अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे आणि सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पाली खोपोलीपासून 38 कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून 111 कि. मी. अंतरावर आहे. 


अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.