Raju Shetti : विधानसभेच्या  निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा (Farmers) सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पुर्तता राज्य सरकारने तातडीने  करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. सरकारनं दिलेला शब्द पूर्ण करावा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन द्यावा, त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 1 जानेवारी रोजी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.


केंद्र सरकारच्या धोरणामुळं शेतकरी रसातळाला गेला


स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुणे येथे काल (25 डिसेंबर) बैठक घेण्यात आली होती. मागील 5 वर्षात केंद्र सरकारच्या धोरणामुळं शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यातच सोयाबीन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी आर्दीच्या पडलेल्या दरामुळं शेतकरी मातीमोल झालेला आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. डी.ए.पी. मध्ये पुन्हा 250 रुपयांची वाढ झालेली आहे. किटनाशके, तणनाशकांच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे. सरकार हमीभाव जाहीर करते. पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतीमाल विकावा लागत असल्याचे शेट्टी म्हणाले.


गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट


गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज हे दुप्पट झालेले आहे. एका बाजूला केंद्र सरकार देशातील कार्पोरट कंपन्यांचे 10 लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत नाही. ते कर्ज राईट ऑफ करत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते. हे अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिलेली आहेत. राज्यात रामराज्य आले असल्याचे महायुतीचे नेते  सांगत आहेत. राज्य सरकारने आपला दिलेला शब्द पाळावा, म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी 1 जानेवारीला जाऊन सरकराने दिलेल्या शब्दांची आठवण करून देतील. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मी स्वतः याबाबत आठवण करून देणार आहे. त्यानंतरही सरकराने आमची दखल घेतलेली नाही. तर राज्यव्यापी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली जाईल, अशी माहिती यावेळी राजू शेट्टी यांनी दिली आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी केलेल्या मागण्यावर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


ऊसाची पहिली उचल 3700 रुपये जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, राजू शेट्टींचा इशारा