Palghar Agriculture News : सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, पालघर (Palghar) जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या सात दिवसापासून सातत्याने पाऊस सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या (Sowing) पूर्णपणे खोळंबल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली होती. मात्र, आज पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून बळीराजा पुन्हा कामाला लागला आहे. 


 जव्हार, मोखाडा या तालुक्यामध्ये शेती कामांना वेग


पालघर जिल्ह्यात 75 हजार हेक्टर क्षेत्रावरवर भात शेतीची लागवड केली जाते. तर इतर क्षेत्रात तूर, वरी, नागली, बाजरी अशी पिकं घेतली जातात. या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी जमिनींची मशागत करताना दिसत आहेत. विशेषतः ही पीक पालघर जिल्ह्यातील पूर्वपट्टीतील घाटमाथ्यावर घेतली जातात. यामध्ये जव्हार, मोखाडा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पावसानं विश्रांती घेतल्यामुळं आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उतरुन नांगरणी करुन विविध पिकांची पेरणी करायला सुरुवात केली आहे. 


पालघर जिल्ह्यातील नदी नाले दुथडी


मुसळधार पावसामुळं पालघर जिल्ह्यातील नदी नाले धबधबे प्रभावित झाले असून मोठा पूर आलेला पाहायला मिळतोय. तर धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या प्रमुख शहरांसह वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत 1161 मिमी पावसाची नोंद झाली असून पालघर तालुक्यात सर्वाधिक 256 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 


राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी


मुंबईसह (Mumbai) राज्यातील काही भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना होऊन गेला तरी पाऊस नसल्यानं शेतकरी (Farmers) चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे तसेच कोकणातील जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं चित्र दिसत आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम पुणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नारिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 


कोकणातही जोरदार


कोकणात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेत चिखलमय झाल्याने नांगरणीत शेतकरी गुंतलेला पाहयला मिळतोय. सध्या कोकणातील गावागावांत पावसाने उगवलेल्या हिरव्यागार गवतामधून बळीराजा शेत नांगरताना निसर्गाचं देखण रुप पाहायला मिळतय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राजयगड जिल्ह्यामध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. खार बंदीस्ताच्या बंधाऱ्याला तडे गेल्यानं परिसरातील 48 गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं गावकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान, आजही हवामान विभागानं रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट