Darshana Jardosh : वस्त्रोद्योगाच्या संदर्भात आपण अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केलं असून, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी अनेकांनी योगदान दिले असल्याचं मत वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश  यांनी व्यक्त केलं. अद्यापही आपल्याला खूप काही करावयाचं आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या निर्मितीसाठी याबद्दलचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक योजना सरकारच्या विचाराधीन असल्याचे त्या म्हणाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथल्या डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट,  यांच्या वतीनं  आज  अ‍ॅन इंटरॅक्शन सेशन विथ टेक्स्टाईल स्टॅक होल्डर्स : परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


'यही समय है, सही समय है' भारत का अनमोल समय है' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जोशपूर्ण कवितेचा उल्लेख करुन तुम्हाला काही करन दाखवायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे. आत्ता नाही तर कधीच नाही, असेही  जरदोश म्हणाल्या. कापडावर सिल्व्हर जॅकार्ट ने विणलेली पंतप्रधानांची प्रतिमा तसंच त्याबरोबर त्यांचं ब्रीदवाक्य आणि स्वाक्षरी असलेल्या फोटो फ्रेम देऊन दर्शना जरदोष यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं. यावेळी डेप्युटी डायरेक्टर जनरल उषा पोळ, जॉईंट टेक्स्टाईल कमिशनर एस.पी. वर्मा, ईसीजीएसच्या पुणे शाखा प्रबंधक सिरसेंदू मुखर्जी, डीकेटीई सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, गारमेंट क्लस्टरचे संचालक  स्वप्निल आवाडे, यांच्यासह  वस्त्रोद्योगातील उदयोजक, तज्ज्ञ, बँक अधिकारी या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते.


दर्शना जरदोश यांनी सांगलीमध्ये देखील जीवन इकोटेक्सटाईलचे उत्पादन पाहिले. त्यामध्ये नॉन वोव्हन, ईको फ्रेंडली स्वरूपाची व पुनर्वापर उत्पादन करण्यासाठीच्या उत्पादनांचा समावेश आहे. डोंगरी व पर्वती भागांमध्येही जीओ टेक्टटाईलने नि‍र्मिती केलेल्या या उत्पादनांचा वापर होत आहे. आपण अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केले असल्याचे त्या म्हणाल्या. गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या निर्मितीसाठी याबद्दलचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक योजना सरकारच्या विचाराधीन आहेत. सांगलीतील या उत्पादनांना पाहून मनस्वी आनंद झाला असून ही उत्पादने अत्यंत चांगल्या दर्जाची आहेत, असेही त्या म्हणाल्या.


मोदी सरकारनं राबवलेल्या विविध योजनांचा लाभ नव उद्योजकांनी घेऊन स्वतःच्या उन्नती बरोबरच देशासाठी कार्य करावं, असं आवाहन दर्शना जरदोष यांनी यावेळी बोलताना केलं. व्हॅल्यूचेन मधील पाच एफचा उल्लेख करत माळेतील मोत्यांप्रमाणे एकत्र कार्य करुन मोदी सरकारचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करावं, असंही त्या म्हणाल्या. पूर्वी कामं करुन घेण्यासाठी दिल्लीला जायला लागायचं. आता दिल्ली तुमच्या दारात आली आहे. यावेळी वस्त्र उद्योजकांच्या विविध समस्या जाणून घेऊन दर्शना जरदोष यांनी त्यांना मार्गदर्शन केलं.