Maharashtra Rain News : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली (Maharashtra Rain News)  आहे. त्यामुळं काही प्रमाणात शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळाला आहे. राज्यातील बीड, सोलापूर अंबरनाथ या भागात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात लोकांना पावसाची प्रतिक्षा होती, अखेर पावसानं हजेरी लावली आहे. 

Continues below advertisement

अंबाजोगाई परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस 

बीड शहरामध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती मात्र आज सायंकाळी 6 च्या सुमारास आकाशात काळे ढग आले आणि त्यानंतर पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.तिकडे अंबाजोगाई परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस बरसलाय.असं असलं तरी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत

तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूर शहरात मुसळधार पावसाचे आगमन

गेल्या काही दिवसापासून पावसाची प्रतिक्षा असलेल्या सोलापुरात तब्बल दीड महिन्यानंतर मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. शहरातील विडी घरकुल, कुंभार वेस भागातील अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. सोलापूर जिल्ह्यात कालपासून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र आज पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोलापूरकर सुखावलेत

Continues below advertisement

अंबरनाथ बदलापूर मध्ये पावसाचा जोर वाढला उल्हासनगरात रिमझिम पाऊस

मागील दोन तासांपासून अंबरनाथ आणि बदलापूर मध्ये पावसाचा जोर वाढलाय. तर तिकडे उल्हासनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मागील आठवडाभरात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु दोन दिवसांपासून पाऊस कोसळतो आहे. आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. बदलापुरातील काही सखल भागात रस्त्यांवर पाणी साचलंय जिथे वाहनधारकांना यातून वाट काढावी लागतेय..

तळकोकणात सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस

तळकोकणात सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावातीलधोंडवाडी येथे तेरेखोल नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. तर चौकुळ गावात देखील मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. घाटमाथ्यावर सकाळी झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला. त्यामुळे शाळेत जाणत्या मुलांना आणि कामाला जाणाऱ्या नागरिकांचा खोळंबा झाला. मात्र आता पावसाचा जोर ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे.