Farmer Success Stories : हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) वसमत तालुक्यातील खंदारबन येथील शेतकरी गंगाधर साधू हे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्यामुळे साधू यांनी काळाची गरज ओळखून त्यांच्या 5 ते 6 एकर शेतीवर मनरेगा अंतर्गत फळपीक लागवड या योजनेतून करवंदाची लागवड केली आहे. याच करवंदाच्या फळापासून पानावर लावलेली गुलाबी चेरी तयार होते. या पिकाला मार्केट दर पण चांगला आहे. या पिकाला फारसे पाणी लागत नाही. फारशी फवारणी व खताचा सुध्दा खर्च नाही. याचे एकरी 5 ते 6 टन उत्पन्न मिळते. यापासून दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न साधू यांना मिळते. 


या करवंदाची लागवड एका रांगेत 4 फुटाच्या अंतरावर व दोन ओळीतील अंतर 20 फूट याप्रमाणे 500 रोपाची लागवड केली आहे. या करवंदाच्या झाडाला 3 वर्षापासून फळे लागण्यास सुरुवात होते व उत्पन्न सुरु होते. 3 वर्षापासून ते पुढील 30 वर्षापर्यंत हमखास उत्पन्न मिळते. याची तोडणी ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये होते. या करवंदासाठी जळगाव, मुक्ताईनगर, गुजरात, दिल्ली येथील कंपन्या शेतातूनच माल खरेदी करुन घेऊन जातात. तसेच त्यामध्ये आंतरपीक म्हणून सिताफळाची लागवड केली आहे. सध्या सिताफळाचे उत्पादन सुरु होण्यास थोडा कालावधी लागणार असल्याचे सांगितले. याच बरोबर साधू यांनी करवंद लागवडीपासून दोन वर्षापर्यंत मधल्या मोकळ्या जागेत सोयाबीन, गहू, हरभरा हे आंतरपीक घेत होते. यापासून सुध्दा त्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी हळूहळू करवंदाची रोपवाटिका तयार केली आहे. त्यांनी 20 ते 25 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करुन देतात. यातूनही त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत सुरु आहे.  


शेतात शेततळे घेतले 


साधू यांनी त्यांच्या शेतात विहीर घेतली आहे. तसेच त्यांनी शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी “मागेल त्याला शेततळे” योजनेतून त्यांच्या शेतात शेततळे घेतले आहे. 


अधिकाऱ्यांनी केली पाहणी...


त्यांच्या प्रयोगशील शेतीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तालुका कृषि अधिकारी गोविंद कल्याणपाड, तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्राची टीम, परभणी विद्यापीठाची टीम तसेच मुंबईच्या स्पाईसेस बोर्डाच्या ममता रुपोलिया यांनी भेट देऊन त्यांनी राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले आहे. शेतकऱ्यांना शेती  व्यवसायामध्ये  टिकायचे असेल तर त्यांनी  नवनवीन प्रयोग केले पाहिजे. यातूनच आपली प्रगती साधली पाहिजे असे साधू म्हणतात.   


इतर महत्वाच्या बातम्या : 


Farmer Success Stories : पैठणच्या शेतकऱ्याला शिमला मिरचीने केले मालामाल; मिळतेय लाखोचे उत्पादन