मंत्री गिरीश महाजन रोहित पवारांच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यांना केला फोन, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
आज मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता.

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्ती न लावता कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विविध संघटनांकडून, राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आज मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. हे आंदोलन पवित्र भूमित होत आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही असे रोहित पवार म्हणाले. त्यामुळं या योजनेतील अन्यायकारक अटी काढाव्यात आणि सरसकट कर्जमाफी कराव्यात अशी मागणी रोहित पवार यांनी केली. सरकार याबाबत सकारात्मक असल्याची माहिती महाजन यांनी दिल्याचे रोहित पवार म्हणाले.
रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजारांचे लिमिट आहे ते वाढवाले पाहिजे
गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले. कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे. मी ज्या मतदारसंघात काम करतो तिथेच अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आहे. सरकारनं काढलेला जीआर महत्वाचा आहे. सरकारचे अभिनंदन करतो. फक्त या जीआरमध्ये अनेक अटी आहेत. यामुळं अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. 2019 ची कर्जमाफी झाली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्यांना आताच्या या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. ही अटक काढा असे रोहित पवार म्हणाले. सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी आहे. रविकांत तुपकर बुलढाण्यात ते आंदोलन करत आहेत. त्यांना देखील भेटा असे रोहित पवार म्हणाले. रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजारांचे लिमिट आहे ते वाढवाले पाहिजे असे रोहित पवार म्हणाले.
जास्त वेळ आपण न बसता उपोषण सोडावं
आपण मुंबईला यावं, तिथे आपण चर्चा करु. 22 तारखेच्या आत बैठक घेऊ यावर सकारात्मक तोडगा काढू असे मुख्यमंत्री मला म्हणाल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. 22 च्या आधी आपण मुंबईत बसून चर्चा करु असे महाजन म्हणाले. उपोषणाला बसून मार्ग निघणार नाही. जास्त वेळ आपण न बसता उपोषण सोडावं असं महाजन म्हणाले. कर्जमाफी झाल्यावर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यासंदर्भात पत्र देणं गरजेचं होते. असे केले असते तर उपोषणाची वेळ आली नसती. काहीतरी मार्ग निघाला असता असे महाजन म्हणाले. जवळपास 37 हजार कोटी रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. चर्चा कल्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो. यासाठी चर्चा करावी लागेल असे महाजन म्हणाले. सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहे. शेतकऱ्यांचे ज्यावेळी नुकसान झाले त्यावेळी सरकारनं चांगली मदत केली असल्याचे महाजन म्हणाले. कर्जमाफीमध्ये सुधारणा झाली पाहिजे, असे वाटत असेल तर आपण चर्चा करु. 22 तारखेच्या आत यामध्ये बैठक घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे महाजन म्हणाले. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे महाजन म्हणाले.






















