Ethanol : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (sugarcne Farmers) आणि साखर कारखानदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मिती करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. या निर्णयामुळं 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे. हा निर्णय साखर कारखानदारांना दिलासा देणाराठरला आहे. 


केंद्राच्या निर्णयाचं स्वागत, पण....राजू शेट्टी काय म्हणाले?


केंद्र सरकारनं इथेनॉलच्या निर्मितीला दिलेल्या परवानगीचे स्वाभिमानी शेतकरी सघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्वागत केलं आहे. इथॉनॉलच्या निर्मितीवर बंदी घालणं हा चुकीचा निर्णय होता. जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येऊन पर्यायी इंधन वापरण्यास प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जीवाश्म इंधनाला इथेनॉल हा पर्याय असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान,  17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करावा अशी अट सरकारनं घातली आहे. ही अट 35 लाख टनापर्यंत वाढवावी अशी मागणी राजू शेट्टींनी केलीय. साखरेचं उत्पादन गरजेपुरतं होणार असल्याचे शेट्टी म्हणाले. 


साखरेच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारनं घेतला होता निर्णय


सध्या देशात साखरेच्या दरात (Sugar Price) मोठी वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात होते. मात्र, वाढता विरोध पाहता सरकारनं पुन्हा इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे.


इथेनॉलमध्ये साखर कारखान्यांनी अब्जावधी रुपये गुंतवले


केंद्र सरकारनं साखर उद्योगातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना प्रोत्साहन , सबसिडी आणि व्याजामध्ये सवलत देऊन इथेनॉलचे प्रकल्प उभे करण्यास सांगितले आहे. साखर उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. यामुळं कोट्यवधी रुपयांचे भाग भांडवल देशातील साखर उद्योगानं यामध्ये गुंतवले आहेत. अशातच अचानक केंद्र सरकारनं इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातली होती. याचा मोठा फटका कारखानदारांना बसणार होता. तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता होती. इथेनॉलमध्ये साखर कारखान्यांनी अब्जावधी रुपये  गुंतवले आहेत, त्याचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. तर केंद्र सरकारनं इथेनॉलच्या उत्पादनावर (ethanol production) घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय आहे. हे आम्हाला कदापी मान्य नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं होतं. देशात साखर कमी पडून साखरेचे दर वाढतील या भितीने केंद्रानं इथेनॉल निर्मितीवरील घातलेली बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली होती.


महत्त्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी, दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय