Unseasonal Rain News : राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना, दुसरीकडे अवकाळी पावसाने तडाखा दिली आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. राज्यातील कोकण, विदर्भासह अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोकणात या अवकाळी पावसाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांचा पडझड जाली आहे. तसेच अन्य ठिकाणी शेतमालाचे नुकसान होण्याची स्थिती आहे. 
 
अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील पारनेर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.तसेच काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील जेजुरी आणि बारामती तालुक्यात मोरगाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासोबत पावसाच्या सरी बरसल्या. त्याचबरोबर बारामती शहरात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.




रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. देवरुख सोबतच संगमेश्वर, जयगड, लांजा भागात अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे वीर देवपाट येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जाले आहे. घरावरील कौले, पत्रे उडून पडले आहेत. तर गुरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे हाती आलेल्या आंबा पिकाचे देखील वादळी वाऱ्याने नुकसान झाले आहे.




गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा चढल्याने उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत होत्या. त्यात हवामान खात्याने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. दरम्यान,  चिपळूण, संगमेश्वर, खेड, दापोली, गुहागरमध्ये जोरदार पाऊस बरसला. तर संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस पडला. या पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. काही गावातील विजही काही तास बंद झाली आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे चिपळूण कराड मार्गावरील पोफळी येथे रस्त्याच्या मधोमध झाड पडल्याने तेथील वाहतूकही ठप्प झाली आहे. या अवकाळी पावसामुळे आधीच उशीरा हातात आलेल्या आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आंबा बगायतदार चिंतेत पडला आहे.