Agriculture News : राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं बळीराजाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. खोळंबलेल्या पेरण्या सुरु झाल्या आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातही सर्वत्र दमदार पाऊस झाला आहे. समाधानकारक पावसामुळं जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. त्यामुळं पेरणीच्या कामांना वेगल आला आहे. 


जिल्ह्यातील 30 टक्के क्षेत्रावर पेरणी


नंदूरबार जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला असून शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात जवळपास 30 टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर्षी सर्वाधिक कापसाचे लागवड केली जाणार आहे तर दुसरीकडे भात लागवडीची तयारी करताना शेतकरी दिसत आहेत. 


सातपुड्याच्या दुर्गम भागात दमदार पाऊस


सातपुड्याच्या दुर्गम भागात दमदार पाऊस झाल्याने अनेक छोटे मोठे नदी नाले प्रवाहित झाले आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. तर दुसरीकडे छोट्या मोठ्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाल्यानं पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. 


कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी  


अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.  शेतकरी आता पेरणीसाठी लगबग करताना दिसत आहेत. पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी दिसून येत आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी शहरी भागात येत आहेत. 


शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी : कृषी आयुक्त


खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र हे 142 लाख हेक्टर आहे. मात्र, पुरेसा पाऊस झाला नसल्यानं प्रत्यक्षात 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 14 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil chavan) यांनी दिली. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. राज्यात सरासरीपेक्षा 39 टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र, जुलै महिन्यात, राज्यात उच्चांकी पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.  कोकण विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाने ओढ दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : राज्यात खते आणि बियाणांचा मुबलक साठा, पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी : कृषी आयुक्त