Dattatray Bharne on Rain: मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी 15 जूनपर्यंत पेरणीची घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन, 24 जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
Dattatray Bharne on Rain: 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावरून दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय.

Dattatray Bharne on Rain: गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेल्या असह्य उष्णतेमुळे (Summer) आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून मान्सूनच्या (Monsoon) पावसाची वाट पाहत आहेत. सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची (Rain) शक्यता कमी असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे (Agriculture Minister Datta Bharne) यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
Dattatray Bharne on Rain: पाऊस आणि पेरणीबाबत शेतकऱ्यांना आवाहन
दत्ता भरणे म्हणाले की, "मी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो की, 12 जून ते 15 जून दरम्यानच्या पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. सध्यातरी मराठवाडा आणि खान्देश भागात सर्वदूर पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा योग्य अंदाज घेऊनच पेरणी करावी, घाई करू नये," असे आवाहन त्यांनी केले आहे.
Dattatray Bharne on Rain: वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
"मे आणि जून महिन्यांत राज्यातील काही ठिकाणी वादळी पाऊस झाला, ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः जळगाव, अमरावती आणि बुलढाणा या भागांत पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. राज्यातील एकूण 24 जिल्ह्यांना या वादळी पावसाचा फटका बसला असून, सुमारे 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीसोबतच लोकांच्या घरांचे देखील नुकसान झाले आहे. या संदर्भात मी सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारी मदत करता येईल," असे दत्ता भरणे यांनी म्हटले.
Dattatray Bharne: युरिया खताचा पुरेसा साठा
दत्ता भरणे पुढे म्हणाले की, आपल्याकडे युरिया खताचा (Urea Fertilizer) पुरेसा साठा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धामुळे थोडी अडचण निर्माण झाली होती, परंतु आम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांना या संदर्भात विनंती केली आहे. शेतकऱ्यांना असे वाटते आहे की जसे पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, तसे खतांचे होऊ नये; मात्र आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तसेच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Dattatray Bharne on Farmer Loan Waiver: कर्जमाफीबाबत काय म्हणाले कृषीमंत्री?
"राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केवळ आचारसंहितेमुळे कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात काही अडचणी आल्या होत्या. या योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे 36 हजार 585 कोटी 56 लाख लाभ मिळण्याचा अंदाज आहे. कर्जमाफीच्या अटींमध्ये काही सुधारणा करणे गरजेचे आहे आणि त्या सुधारणा केल्या जातील. सरकार आर्थिक अडचणीत असून देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मिळून हा चांगला निर्णय घेतला आहे. याशिवाय, आमदार बच्चू कडू यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळण्याच्या मागणीबाबत आम्ही पूर्णपणे सहमत आहोत," असे देखील दत्ता भरणे म्हणाले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा






















